चिमूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट तीव्रतेने पसरत आहे. त्यामुळे यावर नियंत्रणाकरिता जिल्हास्तरावरून प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तहसील कार्यालयात नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कचेरीत कामासाठी आलेल्या नागरिकांना गेटवरूनच परत जावे लागत आहे.
या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रणाकरिता रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी, जीवनावश्यक वस्तूची दुकाने सोडून सर्व प्रकारची दुकाने व प्रतिष्ठाने बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. मास्कची सक्ती, सामाजिक अंतर, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, तपासण्या करणे, लसीकरणास प्रेरित करणे याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग तथा पोलीस विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर निर्बंध असून नागरिक, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे येथील तहसील कार्यालय नागरिकांकरिता प्रवेश बंद असल्याची सूचना महसूल भवन प्रवेशद्वारावर, तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आली आहे. तहसील कार्यालयात सामान्य नागरिक अनेक योजनांकरिता प्रतिज्ञापत्र, जातीचे, रहिवासी, अधिवास आणि अन्य प्रमाणपत्राकरिता येतात. मात्र, अचानक तहसील कार्यालयात प्रवेश बंदी व अत्यावश्यक असल्यास एकाला तेही त्याने आरटीपीसीआर तपासणी प्रमाणपत्र आणल्यास प्रवेश देण्यात येणार असल्याच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत, असे सांगण्यात येत आहे.
कोट
कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन करावे. ३० एप्रिलपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे नागरिकांना तहसील कार्यालयात प्रवेशबंदी आहे. नागरिकांनी गर्दी करू नये.
-संजय नागटिळक, तहसीलदार, चिमूर.