५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 05:00 AM2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:00:31+5:30

तालुक्यातील उत्तर ब्रम्हपुरीत बेलगाव, कोलारी, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव लाडज, सोनेगाव, सावलगाव, बेटाला, पारडगाव, रणमोचन आदी गावात पाण्याची पातळी वाढत असून गावात पाणी शिरले आहे तर दक्षिण ब्रम्हपुरीमध्ये गांगलवाडी, बरडकिन्ही, आवळगाव, वांद्रा, बोळदा, हळदा, मुडझा, एकरा आदी गावात रस्त्यावर पाणी जमा होऊ लागल्याने गावांची वाहतूक बंद झाली आहे.

More than 50 villages were cut off | ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

Next
ठळक मुद्देब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे जलमय : गोसेखुर्दच्या पाण्यामुळे गावात शिरले पाणी, अनेक रस्ते बंद

रवी रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : मध्यप्रदेशातील संजय सरोवर तुडुंब भरल्याने व भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील पूजारी टोला ओव्हरलोड झाल्याने गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाची क्षमता लक्षात घेऊन मोठया प्रमाणात शुक्रवारपासून वैनगंगा नदीतून पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात वाढ होऊन नदीकाठावरील गावात पाणी शिरून गावे जलमय झाली आहेत. ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तर ब्रम्हपुरी पाण्याने वेढली तर दक्षिण ब्रम्हपुरीचे रस्ते बंद झाले आहेत.
तालुक्यातील उत्तर ब्रम्हपुरीत बेलगाव, कोलारी, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव लाडज, सोनेगाव, सावलगाव, बेटाला, पारडगाव, रणमोचन आदी गावात पाण्याची पातळी वाढत असून गावात पाणी शिरले आहे तर दक्षिण ब्रम्हपुरीमध्ये गांगलवाडी, बरडकिन्ही, आवळगाव, वांद्रा, बोळदा, हळदा, मुडझा, एकरा आदी गावात रस्त्यावर पाणी जमा होऊ लागल्याने गावांची वाहतूक बंद झाली आहे. याव्यतिरिक्त शेकडो हेक्टर धान पिकात पाणी शिरल्याने धान पिकांची नासाडी झाली आहे. तर पिंपळगाव, अऱ्हेरनवरगाव, लाडज आदी भागात भाजीपाला पिके वाहून गेली आहेत. घरांची पडझड होण्याची फार मोठी शक्यता निर्माण झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे अधिकारी शर्मा यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी हा विसर्ग २४ तास कायम राहील, असे लोकमतला सांगितले. शासकीय अधिकारी, कर्मचारी बेलगाव, लाडज आदी भागातून बोटीद्वारे ग्रामस्थ बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. पूर ओसरल्यावर शेतीच्या नुकसानीची व घरांच्या पडझडीचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविले
ब्रह्मपुरी तालुक्यात नदीबाहेर आठ ते १० किमीपर्यंत पाणी पसरले. त्यामुळे १५ ते २० गावे पाण्याने वेढली. सदर बाब शनिवारी रात्रीच ब्रह्मपुरीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना माहीत होताच पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रात्रभर फिरून गावोगावी जाऊन लोकांना बाहेर काढले. याची माहिती ठाणेदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना दिली. त्यांनी तातडीने चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम पाठविली. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी स्वत: हजर राहून बेटाला, रणमोचन व परिसरातील राईस मिल, पोल्ट्री फॉर्ममधील अडकलेल्या ४० ते ५० मजुरांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर लाडज या गावात चारही बाजूंनी पाणी शिल्याची माहिती मिळताच ठाणेदार बाळासाहेब खाडे रेस्क्यू टीमसह बोटीने गावात पोहचले. दोन बोटीमार्फत लोकांना पिंपळगावकडे पाठविण्यास सुरुवात केली. याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आली होती. त्यांनी दोन हेलिकॉप्टर बोलावली. त्याद्वारे व बोटीने एकूण १३५० लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आले.

३३ केव्ही उपकेंद्र पुराच्या पाण्यात
गांगलवाडी : गोसेखुर्द धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. वैनगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन छोटया नाल्यांना दाब आल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले. अशातच किन्ही चौगान येथे असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले. उपकेंद्रात येणाऱ्या पाण्याची पातळी झपाटयाने वाढत असल्याने कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून तातडीने महावितरण ब्रम्हपुरी उपविभागाचे अधिकारी लिखार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अभियंते वंजारी, माहुरे, मुंगुले तसेच जनमित्र थाटकर व नवघडे यांनी प्रसंगावधान राखून शनिवारी रात्री १ वाजता जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण करून किन्ही उपकेंद्रातील वीज पुरवठा बंद करून तेथे पुराच्या पाण्यात अडकलेले कार्यरत कर्मचारी यंत्रचालक व सुरक्षा रक्षक यांना सुखरूप ठिकाणी आणण्यात यश मिळविले.

Web Title: More than 50 villages were cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.