उशिराच्या पावसामुळे राज्यात ६० लाख हेक्टरवर पेरणी शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 06:52 IST2023-07-16T06:51:39+5:302023-07-16T06:52:32+5:30

६३ तालुक्यांत ५० टक्क्यांच्या आत पाऊस

Due to late rains, sowing remains on 60 lakh hectares in the state | उशिराच्या पावसामुळे राज्यात ६० लाख हेक्टरवर पेरणी शिल्लक

उशिराच्या पावसामुळे राज्यात ६० लाख हेक्टरवर पेरणी शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर : गेल्या खरीप  हंगामाच्या तुलनेत राज्यात यंदा उशिरा पाऊस आल्याने आतापर्यंत केवळ ८३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या तर अजूनही ६० लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालातून पुढे आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हे जिल्हे भात उत्पादक म्हणून ओळखले जातात. मात्र, रोवणीयोग्य पाऊसच झालेला नाही. राज्यातील एकूण भात रोवणीचा विचार केल्यास आतापर्यंत १५ टक्केच राेवणी झाली आहे.

राज्यात यावर्षी जून महिन्यात सरासरीच्या केवळ ५४ टक्के पाऊस झाला. चालू महिन्यातदेखील १४ जुलैपर्यंत ४४ टक्के कमी पाऊस झालेला आहे. या महिन्यात आतापर्यंत ३३० मिलिमीटरऐवजी केवळ २६४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ६३ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांच्या आत, १४५ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांच्या आत, तर ९७ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झालेला आहे. केवळ ५० तालुक्यांमध्येच १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यात खरिपाचा पेरा १४२ लाख हेक्टरवर होतो. त्यापैकी १०२ लाख हेक्टर गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा झाला होता. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ८३ लाख हेक्टरवर पेरा करता आला आहे. आतापर्यंत कपाशीची ७९, तर सोयाबीनची  ७६ टक्के पेरणी झाली आहे. 

अशी आहे पीकनिहाय पेरणी स्थिती
पेरणी     आतापर्यंत     गेल्यावर्षी आतापर्यंत   
सोयाबीन     ३१.७४ लाख हेक्टर     ३८ लाख हेक्टरच्या पुढे
कपाशी     ३३.३० लाख हेक्टर     ३७ लाख हेक्टर
तूर     ७ लाख हेक्टर    ९.११ लाख हेक्टर
   

Web Title: Due to late rains, sowing remains on 60 lakh hectares in the state