कोरोना रूग्ण वाढल्याने कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:00 AM2021-02-18T05:00:00+5:302021-02-18T05:00:41+5:30
सभागृह मालक व व्यवस्थापकांनी संबंधित पोलीस ठाण्यातून परवागनी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जारी केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमाला परवागनी मिळाल्यानंतर संबंधित ठाणेदारांनी कार्यक्रमस्थळी एक पोलीस शिपाई नियुक्ती करून मास्क व सामाजिक अंतर पाळण्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता विवाह व अन्य कार्यक्रमासाठी असलेली ५० व्यक्तींची मर्यादा कायम ठेवून नाटक व सिनेमा व्यतिरिक्त होणाऱ्या इतर सभा, बैठका, सामुहिक समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमात संबंधित बंदिस्त सभागृह व मोकळ्या जागेच्या क्षमतेतील २५ टक्के अथवा १०० पैकी कमी लोकांच्या उपस्थिती या अटीवरच कार्यक्रम करावे. सभागृह मालक व व्यवस्थापकांनी संबंधित पोलीस ठाण्यातून परवागनी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जारी केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमाला परवागनी मिळाल्यानंतर संबंधित ठाणेदारांनी कार्यक्रमस्थळी एक पोलीस शिपाई नियुक्ती करून मास्क व सामाजिक अंतर पाळण्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिल्या. प्रशासकीय इमारतींच्या परिसरात येताना नागरिकांनी मास्क लावावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
२२ रूग्ण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
जिल्ह्यात २४ तासात २२ कोरोना रूग्णांची नव्याने भर पडली तर एका बाधिताचा मृत्यू झाला जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार २७८ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ७७९ झाली आहे. सध्या १०५ बाधितांवर उपचार सुरू आहे. आज मृत झालेल्यामध्ये आनंदवन वरोरा येथील ७६ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९४ बाधितांचे मृत्यू झाले.
सभागृह, मंगल कार्यालयांना दंड
आदेशाचे उल्लंघन केल्यास सभागृह, मंगल कार्यालय, लॉन, जागा मालक, व्यवस्थापकावर पाच हजार दुसऱ्यांदा १० हजार व तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास २० हजार दंड आकारण्यात येईल. याशिवाय सभागृह, मंगल कार्यालय व जागा सील करणे व गुन्हा दाखल करण्यात येईल. आयोजकांवरही १० हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.