हप्ता भरूनही मिळाले नाही पीक विम्याचे पैसे ! विमा कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराने शेतकऱ्यांचा हिरमोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:17 IST2026-03-28T19:14:48+5:302026-03-28T19:17:04+5:30
Chandrapur : खरीप २०२५ हंगामात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मार्च २०२६ संपत असताना शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची एकही रुपया जमा झाला नाही.

Crop insurance money not received even after paying the premium! Farmers upset over insurance companies' lax management
लोकमत न्यूज नेटवर
विसापूर : खरीप २०२५ हंगामात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मार्च २०२६ संपत असताना शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची एकही रुपया जमा झाला नाही. जानेवारीत रक्कम मिळेल, अशी अपेक्षा होती. पण राज्य शासन व विमा कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
राज्य शासनाने प्रति हेक्टर १७,५०० रुपयांपर्यंत पीक विमा देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात कागदोपत्री प्रक्रिया रखडली असल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजी आहे. शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाइन आणि बैंक शाखांमार्फत प्रीमियम भरला. मात्र नुकसान मूल्यांकन अहवाल व विमा क्लेम प्रक्रियेत विलंब झाल्याने पैसे अडकले आहेत.
२०२४ मध्ये सरकारने एक रुपया योजनेतून विमा भरून दिला होता. यंदा पैसे भरूनही काय फायदा, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. अतिवृष्टीत सोयाबीनाचे पिक उद्ध्वस्त झाले, कर्ज फेडायला पैसा नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यात सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पीक कापणी प्रयोग अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवला.
"बल्लारपूर तालुक्यात सोयाबीन व कापूस पिकाचे एकूण २४ पीक कापणी प्रयोग होते. सर्व अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर झाले. त्या आधारावर पीक विम्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे."
- आकाश पवार, तालुका कृषी अधिकारी बल्लारपूर
"२०२४ मध्ये एक रुपयात विमा मिळाला म्हणून विश्वास ठेवला. २०२५ मध्ये पैसे भरूनही काहीच नाही. सोयाबीन खराब झाले.. कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न आहे."
- प्रशांत अटकारे, शेतकरी हडस्ती