ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस, भाजपात काट्याची टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:27+5:302021-01-19T04:30:27+5:30
४ हजार १९१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ११ हजार ३६४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते. मतमोजणी शांततेत पार पडली. ...
४ हजार १९१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ११ हजार ३६४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते. मतमोजणी शांततेत पार पडली. चंद्रपूर तालुक्यातील ३७, बल्लारपूर तालुक्यातील १०, भद्रावती ५३, वरोरा ७८, कोरपना १६, राजुरा २८, जिवती १, गोंडपिपरी ४३, पाेंभुर्णा २७, सावली ५०, सिंदेवाही ४५, मूल ३७, ब्रह्मपुरी ६८, नागभीड ४१, चिमूर तालुक्यातील ८० या ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आघाड्यांच्या माध्यमातून ताकदीने निवडणूक रिंगणात उतरले होते. जिल्ह्यातील निम्मे मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्यामुळे जिल्ह्याचा कौल कोणत्या पक्षाला हे यातून पुढे येणार होते. या अनुषंगाने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. निकाल लागताच सर्वच राजकीय पक्ष आपले वर्चस्व प्रस्थापित झाल्याचा दावा करू लागले. अनेक ग्रामपंचायतींवर कोणत्याही एका आघाडीला बहुमत मिळाले नसल्यामुळे अशा ठिकाणी अपक्षांना महत्त्व प्राप्त झाले असून, पळवापळवीचे राजकारण होण्याची चिन्हे दिसत आहे. सकाळी १० वाजतापासून तालुका मुख्यालयी मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल येताच समर्थकांकडून एकच जल्लोष होत होता.