उद्धव ठाकरेंची उद्याच जाहीर सभा, बंडखोर आमदार-खासदारांच्या बालेकिल्ल्यात गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 15:43 IST2022-11-25T15:41:49+5:302022-11-25T15:43:25+5:30
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रेमींनी दोन दिवसांत एकत्र यावे

उद्धव ठाकरेंची उद्याच जाहीर सभा, बंडखोर आमदार-खासदारांच्या बालेकिल्ल्यात गर्जना
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. अमेझॉनवरुन आलेलं हे पार्सल आता परत पाठवा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही निशाणा साधला. महाराष्ट्रातील ४० गावांवर दाव केल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अंगात भूत शिरल्याचं ते म्हणाले. राज्यपालांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र बंदची हाकही त्यांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होत आहे. विशेष म्हणजे बंडखोर आमदार-खासदारांच्या जिल्ह्यात उद्या शिवसेनेची तोफ धडाडणार आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रेमींनी दोन दिवसांत एकत्र यावे. सर्वांकडून गुळमुळीच प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भाजपाकडून मिळमिळीत प्रतिक्रिया येत आहेत. कुणीही टपलीत मारावे असे राजकारण सुरु असल्याचे म्हणत वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करू, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिला होता. त्यातच, आता औरंगाबादनंतर बुलडाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होत आहे. त्यासाठीच्या तयारीही पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी बुलडाणातील सभास्थळाला भेट दिली.
राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुलढाण्यातील चिखलीमध्ये शनिवार २६ नोव्हेंबर रोजी त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांनी आज सभास्थळाची पाहणी केली. बुलढाणा जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याकडे उद्धव ठाकरे गटाचे विशेष लक्ष आहे. याच महिन्यात आदित्य ठाकरे देखील बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी दोन्ही बंडखोर आमदार आणि खासदारांवर तोफ डागली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे बुलढाण्यात येत असून, ते कोणावर आपले टीकास्त्र सोडतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटातील ८ आमदार आणि ३ खासदार शिंदे गटात येणार असल्याचं विधान केलं होतं. त्यावरही उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.