आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:44 IST2025-06-17T17:43:51+5:302025-06-17T17:44:44+5:30
Buldhana News Marathi: आजाराचे लक्षणे दिसताच त्वचाविकाराचा संसर्ग होत असल्याची शंका निर्माण झाली होती; मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून तपासणी केली.

आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
Buldhana latest news: बुलढाणा जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांपासून केसगळती आणि त्यानंतर नखगळतीचे प्रकार समोर आल्यानंतर, आता मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख या सुमारे ५,५०० लोकसंख्येच्या गावात हाताला भेगा पडण्याच्या तक्रारी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आजाराचे लक्षणे दिसताच त्वचाविकाराचा संसर्ग होत असल्याची शंका निर्माण झाली होती; मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून तपासणी केली आणि हा आजार संसर्गजन्य नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
एकीकडे केस व नख गळतीच्या प्रकारांबाबत अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसतानाच या नवीन प्रकारामुळे गावात संभ्रम निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा निवास असलेल्या तालुक्यातच हा प्रकार आढळल्याने आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला.
या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी जिल्हा साथरोग व सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रट, स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी मिश्रा यांनी तपासणी केली.
'ऑटो इम्यून' स्वरूपाचा आजार
आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा आजार संसर्गजन्य नसून 'ऑटो इम्यून' स्वरूपाचा आहे. याचा अर्थ, शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा स्वतःच्या त्वचेविरोधात प्रतिक्रिया देते, विशेषतः जेव्हा ती डिटर्जंट, रसायने, साबण, कीटकनाशके यांसारख्या घटकांशी संपर्कात येते. पाण्याचा या आजाराशी कोणताही थेट संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कशामुळे होतोय हा आजार?
पामो-प्लांटर एक्झिमा' किंवा 'केराटोडर्मा' हे आजार दीर्घकालीन स्वरूपाचे असतात. त्यांचे पूर्णपणे बरे होणे शक्य नसले, तरी उपचारांद्वारे त्यांना नियंत्रणात ठेवता येते. विशेषतः रासायनिक सवयी, घरगुती डिटर्जंट आणि अलर्जीक घटक टाळल्यास लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा होते. यासोबत योग्य मलमे व जीवनशैलीतील बदल गरजेचे असतात, असे त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रट यांनी सांगितले.
जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे म्हणाले, "कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर, साबण, डिटर्जंट, तसेच शेतीतील रसायनांपासून हातांचे संरक्षण आवश्यक आहे. लक्षणे दिसताच त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."