लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम ( बुलडाणा) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्यशक्तींना वाटते, त्या शक्तींनीच विवेकानंद आश्रम व स्व. शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली आहे. यामुळे ९१ वे साहित्य संमेलन आयोजनाचा प्रस्ताव मागे घेत असल्याची घोषणा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी येथे केली. यासंदर्भात अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष आर. बी. मालपाणी म्हणाले, दीन दुबळ्य़ांना बळ देण्याचे कार्य नेहमीच स्व. शुकदास महाराज व विवेकानंद आश्रमाने केले. ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लाखो जनतेला हे सर्व पाहायला मिळणार होते; परंतु हे संमेलन कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, अशी इच्छा असलेला एक वर्ग आहे; त्यांना विवेकानंदांचा बुद्धिप्रामाण्यवाद, धर्मनिष्ठा आणि आश्रमाची त्याग, सेवा, सर्मपणाची संस्कृती संमेलन आयोजनस्थळात अडचण ठरत असल्याने ते खोटे आरोप करत आहेत. परिणामी आश्रमाच्या कार्याशी जुळलेल्या लाखो संवेदनशील नागरिकांची मने दुखावली आहेत. त्यामुळे त्यांचा संमेलनातील सहभाग केवळ शारीरिक राहणार असेल, तर संमेलनाचा उद्देशच सफल होऊ शकत नाही. भाषा, साहित्य, संस्कृतीचा प्रचार व प्रसार हाच साहित्य संमेलनाचा पवित्र हेतू आहे, हा हेतूच सफल होऊ शकत नसेल, तर आणखी ताणून धरण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत, असेही मालपाणी यांनी जाहीर केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव व त्यांच्या सहकार्यांच्या आरोपांना विवेकानंद आश्रमाच्यावतीने सहसचिव तथा मुख्य प्रवक्ते संतोष गोरे, सह प्रवक्ते पुरुषोत्तम सांगळे, आत्मानंद थोरहाते यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. मानव यांच्या भूमिकेचा नागरिकांकडून ठिकठिकाणी निषेधही करण्यात येत आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
विवेकानंद विचार साहित्य संमेलन घेणार!विवेक विचारांचा प्रचार करणारे असलेले विवेकानंद विचार साहित्य संमेलन स्वतंत्रपणे विवेकानंद जयंतीनिमित्त आम्ही आयोजित करणारच आहोत, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही आर. बी. मालपाणी यांनी यावेळी केली.