रस्त्याची मालकी कुणाची, दोन विभागात संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:00 AM2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:30+5:30
कर्कापूर - रेंगेपार व हरदोली असा सुमारे सहा किलोमीटरचा हा रस्ता आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. पंरतु हा रस्ता अर्धवट आहे. सुमारे ७००मीटर रस्त्याचे बांधकाम झालेच नाही. आता या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेवून जावे लागते. एसटी महामंडळाने या रस्त्याच्या अवस्थेने चक्क बसच बंद केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील कर्कापूर ते रेंगेपार रस्ता चिखलमय झाला असून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना यांच्यात मालकीवरुन संभ्रम निर्माण झाला. आता हा रस्ता नेमका कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला असून ७०० मीटर रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कर्कापूर - रेंगेपार व हरदोली असा सुमारे सहा किलोमीटरचा हा रस्ता आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. पंरतु हा रस्ता अर्धवट आहे. सुमारे ७००मीटर रस्त्याचे बांधकाम झालेच नाही. आता या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेवून जावे लागते. एसटी महामंडळाने या रस्त्याच्या अवस्थेने चक्क बसच बंद केली आहे.
आता या रस्त्याच्या दुरुस्तीवरुन मालकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना की जिल्हा परिषद बांधकाम विभाग यापैकी मालकी कुणाची असा सवाल आहे.
यासंदर्भात गुरुवारी पंचायत समिती परिसरातील दोन्ही विभागांना भेटी दिल्या. दोन्ही विभागाच्या अभियंत्यानी रस्त्याच्या मालकीवरुन एकमेकांकडे बोट दाखविले. शासकीय विभागाला रस्त्याच्या मालकीवरुन प्रश्न पडल्याने कामकाजावर संभ्रम निर्माण झाल आहे.
याकामाची सुरुवात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झाली. परंतु आता काम रखडल्याने सामान्य नागरिक भरडले जात आहे. या प्रकाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केली आहे.