दहा प्रकल्पांच्या पाण्याचा भार एकट्या गोसेखुर्दवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:38+5:302021-09-18T04:38:38+5:30

भंडारा : गोसे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला की बुडीत आणि लाभक्षेत्रातील वैनगंगा नदीतीरांवरील गावांना महापुराचा धोका असतो. नियंत्रित ...

The water load of ten projects is on Gosekhurd alone | दहा प्रकल्पांच्या पाण्याचा भार एकट्या गोसेखुर्दवर

दहा प्रकल्पांच्या पाण्याचा भार एकट्या गोसेखुर्दवर

googlenewsNext

भंडारा : गोसे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला की बुडीत आणि लाभक्षेत्रातील वैनगंगा नदीतीरांवरील गावांना महापुराचा धोका असतो. नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग झाला नाही तर महापुरात कोट्यवधी रुपयांची हानी होते. दहा प्रकल्प आणि चार नद्यांचे पाणी एकट्या गोसेखुर्द प्रकल्पात येत असल्याने नियोजन करताना मोठी तारांबळ उडते. त्यातच समन्वयाचा अभाव असला की गतवर्षीसारखी भीषण स्थिती निर्माण होते.

पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. वैनगंगा ही विशाल नदी असून तिच्या बावनथडी, बाघ, सूर आणि कन्हान या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेत येते. पर्यायाने त्याचा संजय गोसेखुर्द प्रकल्पात होतो. यासोबतच मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसराट, धापेवाडा आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पांसह कन्हान नदीवरील पेंच, तोतलाडोह, पवनारखैरी आणि चवराई या प्रकल्पांचे पाणीही गोसेखुर्द प्रकल्पात जमा होते. वर्षभर यापासून कोणताही धोका नसला तरी पावसाळ्यात मात्र अतिवृष्टी झाली की या प्रकल्पांचे पाणी सोडले जाते आणि संपूर्ण भार एकट्या गोसेखुर्द प्रकल्पावर येऊन पडतो. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करताना मोठी कसरत करावी लागते. एकाच वेळी पाण्याचा विसर्ग केला तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण होते.

गतवर्षी महापुराला हेच कारण महत्त्वाचे ठरले. संजय सरोवरासह सर्व दहा प्रकल्पांतील पाणी एकट्या गोसेखुर्द प्रकल्पात जमा झाले. त्यामुळे बॅकवाॅटरमध्ये असलेल्या भंडारा शहरासह अनेक गावांना पुराचा फटका बसला. गोसेखुर्दचे ३३ दरवाजे सतत सात दिवस गतवर्षी उघडावे लागल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यँत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याचा अनुभव पाठीशी असल्याने यंदा प्रशासनाने समन्वयाच्या माध्यमातून पाणी नियंत्रणावर भर दिला आहे. सर्व प्रकल्पाचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एकमेकांच्या संपर्कात आहेत.

बॉक्स

संजय सरोवरचे पाणी आज पोहोचणार कारधात

मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्प गुरुवारी ९४ टक्के भरल्याने त्याचे तीन गेट उघडण्यात आले होते. दोन गेट अर्धा मीटरने, तर एक गेट एक मीटरने उघडण्यात आले. २९४.५० क्युसेक पाण्याचा विसर्ग गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आला. सतत नऊ तास पाण्याचा विसर्ग झाला. या प्रकल्पातून सोडलेले पाणी भंडारालगतच्या कारधा येथे वैनगंगा नदीत येण्यासाठी ३९ तास लागतात. त्यामुळे साधारणत: शनिवारी या प्रकल्पाचे पाणी पोहोचणार आहे. त्यामुळे गोसेखुर्दच्या जलसाठ्यात वाढ होणार असून पाणीविसर्गासाठी नियोजन करण्यात आले आहे.

बॉक्स

पुजारीटोलाचे १२ गेट उघडले

गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला प्रकल्पाचे १२ गेट ०.३० मीटरने उघडण्यात आले असून २८६.४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हे सर्व पाणी वैनगंगेच्या माध्यमातून गोसेखुर्द प्रकल्पातच येणार आहे. पुजारीटोलापासून पाणी येण्यासाठी ३२ तासांचा अवधी लागणार आहे. यामुळे नदीतीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: The water load of ten projects is on Gosekhurd alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.