कोरोना संकटामुळे उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:56+5:30
अभयारण्यात काम करण्यासाठी वनविभागाचे नियमित कर्मचारी आहेत त्यांना वेतन दिले जाते. पण पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेल्यामध्ये जिप्सीचे मालक व चालक, गाईड व अन्य मदतगार असे शेकडो व्यक्ती गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. अभयारण्यात काम करण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याने इतर कामे त्यांना अवघड वाटत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : उन्हाळ्यात प्राणी, पक्षी यांचे सहजपणे दर्शन घडते म्हणून अभयारण्य असो वा व्याघ्र प्रकल्प येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ असते. मात्र यावर्षी कोरोना विषाणूंच्या संकटामुळे पर्यटनाचे सर्व ठिकाण बंद ठेवण्यात आले आहे. पर्यटकांसाठी अभयारण्य बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कित्येकांना उपासमारीची वेळ आली आहे.
उमरेड कऱ्हांडला पवनी अभयारण्य उन्हाळ्यात पर्यटकांनी गजबजलेला राहायचा परंतु यावेळी कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशभर टाळेबंदी असल्याने सर्व पर्यटनस्थळे बंद होती. उमरेड पवनी क?्हांडला अभयारण्य सुद्धा बंद आहे.
अभयारण्यात काम करण्यासाठी वनविभागाचे नियमित कर्मचारी आहेत त्यांना वेतन दिले जाते. पण पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेल्यामध्ये जिप्सीचे मालक व चालक, गाईड व अन्य मदतगार असे शेकडो व्यक्ती गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगार झाले आहेत.
त्यांच्या हाताला काम नाही. अभयारण्यात काम करण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याने इतर कामे त्यांना अवघड वाटत आहेत. काम नाही त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अभयारण्यात प्रवेश बंदी असल्याने वनविभागाचे महसूल बुडाले, पर्यटकांची हौस बुडाली व अवलंबून असलेल्यांचा रोजगार बुडाला. कोरोना संकटामुळे कित्येकांना उपासमारीची वेळ आली आहे.