तर कर्जमुक्ती हुकणार ! शेतकऱ्यांच्या 'या' हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 20:26 IST2026-02-23T20:25:29+5:302026-02-23T20:26:35+5:30
Bhandara : शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. आधार व फार्मर आयडी नोंदणीतील त्रुटी, अपुरी कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Then loan waiving will be missed! Due to 'this' laziness of farmers, there are signs that the benefits of the loan waiver scheme will be in danger.
भंडारा : शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. आधार व फार्मर आयडी नोंदणीतील त्रुटी, अपुरी कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून अर्ज अंतिम करण्याचे आवाहन केले आहे. शासनाकडून कर्जनिवारणासाठी आवश्यक माहिती संकलनाचे काम वेगाने सुरू आहे.
मोहाडी तालुक्यासह विविध भागांतील थकीत कर्जदारांचा तपशील गोळा केला जात आहे. सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत ही माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदवली जात आहे, तसेच कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देता येईल. परंतु अनेकांनी अद्याप आधारकार्ड, फार्मर आयडी व संबंधित कागदपत्रे संस्थांकडे जमा केलेली नाहीत. त्यामुळे माहिती अपूर्ण राहत असून ऑनलाइन प्रणालीतील नोंदणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.
या विलंबाचा परिणाम भविष्यात जाहीर होणाऱ्या कर्जमाफी अथवा सहाय्य योजनांवर होऊ शकतो. शेतकऱ्यांनी वेळ न दवडता आपल्या संबंधित सेवा सहकारी संस्था किंवा बैंक शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्लक्षामुळे शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देणे नितांत गरजेचे झाले आहे.
...तर नोंदणी अडणार
ज्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी अद्याप आधारकार्ड, फार्मर आयडी व इतर आवश्यक माहिती दिलेली नाही, त्यांनी तातडीने सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेशी संपर्क साधावा. माहिती अपूर्ण राहिल्यास शासनाच्या पोर्टलवर नोंदणी होऊ शकणार नाही. वारंवार सांगुनही शेतकरी नोंदणी किंवा माहिती अपलोड करीत नसल्याने प्रशासनही हतबल आहे.
"शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे त्वरित जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यातील कर्ज निवारण योजनांचा लाभ मिळण्यात बळीराजाला अडचणी येऊ शकतील."
- विलास देशपांडे, सहायक निबंधक सहकारी संस्था, मोहाडी
"शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची आशा होती. फार्मर आयडी नसल्यामुळे आमच्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तातडीने तालुका पातळीवर विशेष शिबिर घेऊन नोंदणी करून घ्यावी. तरच त्यांना लाभ मिळू शकेल."
- भगवान चांदेवार, अध्यक्ष, भाजप तालुका, मोहाडी