जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:10 PM2019-07-30T22:10:05+5:302019-07-30T22:10:41+5:30

दीर्घ विश्रांतीनंतर गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून या पावसाने शेतकरी सुखावला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात २८.५ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पवनी तालुक्यात १०६.४ मिमी पाऊस झाला आहे.

Presence of strong rains all over the district | जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी

जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी

googlenewsNext
ठळक मुद्दे२४ तासात २८.५ मिमी पाऊस : पवनी तालुक्यात सर्वाधिक १०६.४ मिमी पावसाची नोंद, भातपिकाला जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दीर्घ विश्रांतीनंतर गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून या पावसाने शेतकरी सुखावला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात २८.५ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पवनी तालुक्यात १०६.४ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० जुलै या कालावधीत ३९२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तीन दिवसांपासून अविश्रांत पाऊस कोसळत असल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला असून जनजीवन ठप्प झाले आहे. या पावसाने जिल्ह्यात कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
जिल्ह्यात शनिवार सायंकाळपासून पावसाला प्रारंभ झाला. अविश्रांत पाऊस कोसळत आहे. सुरुवातीला रिमझीम बरसणारा पाऊस मंगळवारी दिवसभर जोरदार कोसळत होता. मंगळवारी तर पावसाने क्षणभरही विश्रांती घेतली नाही. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात २८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी असून या कालावधीत ६२४.१ मिमी पाऊस अपेक्षित असतो. आतापर्यंत ३९२.७ मिमी पाऊस कोसळला. हा सरासरीच्या ६३ टक्के आहे. सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्यात १०६.४ मिमी कोसळला असून अनेक शेतात पाणी साचले आहे. तसेच सखल भागातही पाणी साचले आहे. पवनी तालुक्यातील पालोरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणाला तलावाचे स्वरुप आले होते. तीन आठवड्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर आलेल्या या पावसाने शेतकरी सुखावला आहे. रोवणी झालेल्या भातपिकाला जीवदान मिळत आहे. रखडलेली रोवणीची कामे वेगाने सुरु झाली आहेत. जिल्ह्यातील नदी-नाले खळखळून वाहायला लागले असून अनेक गावातील पाणी टंचाईची समस्या सुटली आहे. या पावसाने वातावरणात गारठा निर्माण झाला असून दिवसरात्र पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

दोन तालुक्यात अतिवृष्टी
गत २४ तासात भंडारा जिल्ह्यातील पवनी आणि लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. एकट्या पवनी तालुक्यात १०६.४ मिमी तर लाखांदूरमध्ये ६७.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. भंडारा तालुक्यात ६.३ मिमी, मोहाडी ३.३ मिमी, साकोली ६.८ मिमी आणि लाखनीत ९.६ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र तुमसर तालुक्यात गत २४ तासात कुठेही पाऊस पडला नाही

वैनगंगेचा जलस्तर अर्धा मीटरने वाढला
राज्याच्या सीमावर्ती भागात आणि वैनगंगेच्या उगमस्थानाकडे जोरदार पाऊस झाल्याने अवघ्या दहा तासात वैनगंगा नदीच्या जलस्तरात अर्धा मीटरने वाढ नोंदविण्यात आली. भंडारा शहराजवळील कारधा येथे ६.६० मीटरने वैनगंगा वाहत आहे. विशेष म्हणजे धोक्याच्या पातळीच्या ९.५० मीटर खालीच पाणी पातळी आहे. वैनगंगेचा जलस्तर मंगळवारी सकाळी ८ वाजता ६.१५ मीटर नोंदविण्यात आला. सायंकाळी ६ वाजता त्यात ०.४५ मीटरने वाढ होऊन जलस्तर ६.६० मीटरवर पोहचला. संततधार पावसामुळे कोरडी पडलेली बावनथडी नदीही प्रवाहित झाली आहे. तुमसर तालुक्यातील चिखली (सीतेकसा) येथे बावनथडीचा जलस्तर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ०.३० मीटर नोंदविण्यात आला आहे. बावनथडी प्रकल्पाच्या साठ्यातही वाढ होत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कुठेही रस्ते पावसामुळे बंद पडले नाही. वाहतूक सुरळीत सुरु होती.

Web Title: Presence of strong rains all over the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.