विद्युत कंपनीने उगारला वीज खंडितचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST2021-01-21T04:31:47+5:302021-01-21T04:31:47+5:30

विरली (बु.) : नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सर्व थकीत वीजग्राहकांना नोटीस बजावून येत्या १५ दिवसांत वीज बिल ...

Power outage caused by power company | विद्युत कंपनीने उगारला वीज खंडितचा बडगा

विद्युत कंपनीने उगारला वीज खंडितचा बडगा

विरली (बु.) : नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सर्व थकीत वीजग्राहकांना नोटीस बजावून येत्या १५ दिवसांत वीज बिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या नोटिसांमुळे लाॅकडाऊन काळातील वीज बिल माफीची आशा मावळली असून, जनतेत शासनाविरुद्ध तीव्र असंतोष खदखदत आहे.

कोरोना संकटामुळे अपरिहार्य ठरलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. परिणामी शासनाने जनतेला मोफत अन्नधान्य, कर्जाच्या हप्त्यांमध्ये सवलत अशा अनेक सुविधा दिल्या. त्याच पार्श्वभूमीवर शासन लाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करील, अशी जनतेची रास्त अपेक्षा होती. मात्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नुकत्याच बजावलेल्या नोटिसांमुळे जनतेची आशा धुळीस मिळाली. अनेक वीज ग्राहकांकडे मार्च २० पासूनची बिले थकीत आहेत. विद्युत वितरण कंपनीने दर महिन्याच्या थकीत बिलावर व्याज आकारल्यामुळे या बिलांची रक्कम आणखी फुगली आहे. काही शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी झाली असली तरी त्यांचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत; तर अनेक शेतकऱ्यांचे धान मोजणीच्या प्रतीक्षेत खरेदी केंद्रावर पडून आहे. अशा परिस्थितीत एवढे मोठे बिल एकाच वेळी कसे भरावे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

दरम्यान, शासनाने किमान लाॅकडाऊनच्या काळातील तीन-चार महिन्यांचे वीज बिल माफ करावे, अशी जनतेची मागणी आहे. विरली (बु.) वीज वितरण केंद्रांतर्गत परिसरातील २३ गावे येतात. ज्या ग्राहकांकडे पाच हजार वा त्यापेक्षा अधिक वीज बिल थकीत आहे, अशा सुमारे ५०० ग्राहकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: Power outage caused by power company