नवी दिल्ली - भारत जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असली तरी जगातील टॉप १० देशांमध्ये भारताचे स्थान पाचव्या क्रमाकांवरून सहाव्या स्थानी आले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन या घसरणीला कारण ठरल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक’ अहवालातून समोर आले आहे.
जागतिक विकासाचा वेग मंदावणार
आयएमएफच्या मते, जागतिक अर्थव्यवस्था सध्या ‘प्रतिकूल स्थिती’कडे झुकत असून, २०२६ मध्ये जागतिक विकासाचा दर ३.१ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो.
५ ट्रिलियन डॉलरचे स्वप्न, वास्तव
पंतप्रधान मोदींनी भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या भारताचा जीडीपी सुमारे ४.१५ ट्रिलियन डॉलर इतका आहे. काहीकाळापूर्वी भारताने ब्रिटनला मागे टाकले होते.
चलनाच्या विनिमय दरातील चढ-उतार आणि भारताने अलीकडेच जीडीपी मोजणीचे आधारभूत वर्ष २०११-१२ वरून २०२२-२३ केल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आकड्यांमध्ये किरकोळ घट दिसून आली आहे.
क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलो तरी, भारताचा विकास दर चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे. आयएमएफच्या मते, २०२६ आणि २०२७ मध्ये भारताचा विकास दर ६.५ % राहील, जो प्रमुख देशांमध्ये सर्वाधिक आहे. भारतीय अर्थव्यवस्था येणाऱ्या काळात पुन्हा गरुडझेप घेण्यास सज्ज आहे.
युद्धाच्या वाढत्या व्याप्तीमुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि महागाई वाढण्याचा धोका असून, यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा मार्ग भरकटू शकतो.
२०३० पर्यंत ‘टॉप ३’ मध्ये पुन्हा स्थान
सध्याचा हा बदल केवळ तात्पुरता आहे. २०३०-३१ पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे आयएमएफने म्हटले आहे.
