सहा महिन्यांपासून बांबूचा पुरवठा बंद

By Admin | Updated: April 24, 2016 00:38 IST2016-04-24T00:38:28+5:302016-04-24T00:38:28+5:30

येथील वनविभागाच्या डेपोतून सहा महिन्यांपासून बुरड कामगारांना बांबुचा पुरवठा करण्यात आलेला नाही.

Closed bamboo supply for six months | सहा महिन्यांपासून बांबूचा पुरवठा बंद

सहा महिन्यांपासून बांबूचा पुरवठा बंद

वनविभागाची अनास्था : बांबू टंचाईने बुरड कामगारांवर बेकारीचे सावट
साकोली : येथील वनविभागाच्या डेपोतून सहा महिन्यांपासून बुरड कामगारांना बांबुचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाखांदूर फाटा परिसरात राहणाऱ्या ४० कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही वनविभागाने बांबू पुरवठा केला नाही. परिणामी बुरड कामगारांचा व्यवसाय बंद पडला आहे.
परिसरात बुरड समाजाची ४० कुटूंबे राहतात. यातील १५० महिला-पुरुषांची उपजीविका बांबूपासून दैनंदिन उपयोगाचे व कलाकुसरीच्या वस्तू तयार करुन त्यांच्या विक्रीतून होते. बुरड समाजासाठी येथील वनविभगाच्या डेपोतून बांबूचा पुरवठा करण्यात येत होता. परंतु मागील वर्षात दिवाळीनंतर या डेपोतून बांबुचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांची गरज असूनही या कामगारांना सूप, टोपल्या, वडगे आदीचा पुरवठा करता आला नाही.
मागील सहा महिन्यांपासून वनविभागाच्या डेपोतून बांबूचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे बुरड कामगारांवर बेरोजगारी आली असून त्यांच्या कुटूंबाचा उदनिर्वाह करणे कठीण झाले आहे. काही कामगारांनी नवेगावबांध येथील डेपोतून मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यासाठी चार ते पाच दिवस मुक्काम करावा लागतो.
बांबूचा दर्जा योग्य नाही. शिवाय वाहतुक खर्चही अधिक येत असल्याने वस्तुच्या किंमती वाढतात त्या शेतकऱ्यांना परवडत नाही. शेतकऱ्यांच्या शेतातील बांबू प्रति नग प्रमाणे खरेदी करावा लागतो. त्यामुळे तो सुध्दा परवडत नाही.
अशावेळी वनविभागाचे बांबूचा पुरवठा करावा याकरिता समाज बांधवांनी पाठपुरावा केला. परंतु त्याबाबत अधिकाऱ्यांची अनास्था असल्याने मागील सहा महिन्यापासून कामगारांना बांबूचा पुरवठा झाला नाही.
या समाजातील महिला-पुरुषांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे याकरिता साकोली डेपोतून बांबूचा पुरवठा करावा, अशी मागणी अखिल खडतकर, अंजना नागपूरे, अंकिता नागपूरे, सुनील गऱ्हाटे, शंकून गऱ्हाटे, गोपाल नागपूरे यांच्यासह बुरड कामगारांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

बुरड लोकांच्या कामासाठी आपल्याकडे योग्य बांबू नाही. नवेगावबांध, चिचगड व गोंदिया डेपोतून बांबू मागवावा लागतो. एका ट्रकमध्ये २५०० ते ३००० बांबू येतात. त्यातून ते निवडून ८०० ते १००० काढतात. वाहनाची कमतरता असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात त्यांना वेळेवर बांबु उपलब्ध नाही.
- मनोहर गोखले, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) साकोली.

Web Title: Closed bamboo supply for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.