Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:21 IST2025-11-21T11:19:41+5:302025-11-21T11:21:21+5:30
Spiritual: आजपासून मार्गशीर्ष महिना सुरु झाला, अध्यात्मिक उन्नतीसाठी हा महिना महत्त्वाचा मानला जातो, त्यासाठी कोणते बदल करावे ते जाणून घेऊ.

Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
एका गावात एक व्यक्ती राहत होती. रोज नित्याची कामे करून मठात जात असे. तिथे त्यांना एक दिवस एक तपस्वी भेटला. त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी विचारले, काय मागायचे आहे तुला ते माग. आपल्या मनातील त्यांनी ओळखले ह्या आनंदात त्या व्यक्तीने सांगितले, की महाराज संसारात सर्व सुखप्राप्ती आहे पण कितीही काहीही झाले तरी समाधान मिळत नाही त्यासाठी काय करावे? त्यावर त्यांनी सांगितले की कुणाचीही निंदा करायची नाही आणि कुणी करत असेल तर तिथे ऐकायला श्रोते म्हणूनसुद्धा उभे राहायचे नाही. अखंड नामस्मरण करत राहा. निदान तसा प्रयत्न तरी सुरु कर. अजिबात वेळ फुकट घालवू नकोस. त्यांना नमस्कार करून तो माणूस गावातील पाराजवळ गेला. जिथे तो रोजच आपल्या मित्रांना भेटला जात असे.
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
तिथे हेच चालू होते. त्याने आपल्या मित्रांना सांगितले की आताच मी एका योगी पुरुषाला भेटून आलो आहे आणि त्यांनी मला जे सांगितले ते तुम्हाला सांगतो. मला ते पटले आहे तुम्हालाही पटेल. सगळ्यांनी उत्सुकतेने विचारल्यावर त्याने सांगितले की आजपासून मुखाने फक्त नाम घ्यायचे, कुणाहीबद्दल वाईट बोलायचे नाही आणि ऐकायचे सुद्धा नाही. ठरले तर मग! सगळ्यांनी त्याला संमती दिली. पुढील १० मिनिटे नि:शब्द शांतता, कुणीच काही बोलेना. कारण कुणाबद्दल चांगले बोलायची आपल्या जिभेला सवयच नाही मुळी. सतत ह्याचे त्याचे करत बसणारे आपण कुणाबद्दल चांगले बोलायचे तर आपले शब्द भांडार अपुरे पडते.
सांगायचे तात्पर्य, ह्या षड्रिपूंपासून तुम्हा आम्हा कुणाचीही सुटका नाही. पण, आपण त्यातून सुटण्यासाठी प्रयत्न तरी करू शकतो. प्रयत्नांचे सामर्थ्य विचार प्रणाली बदलवण्याचे सामर्थ्य नक्कीच ठेवतात. दिवसभरात आपला किती वेळ फुकट चालला आहे ते शोधून काढले तर समजेल की परमेश्वरापासून आपण किती दूर आहोत आणि त्याचे मूळ कारण सुद्धा हेच आहे.
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा
कुणाचे तरी काहीतरी वाईट चिंतणे, मुखाने बोलणे आणि ऐकणेसुद्धा हे आपल्या महाराजांना आवडेल का? हा प्रश्न स्वतःलाच विचारायची गरज आहे.
कधीतरी आपल्याला राग येतो. कुणीतरी आपल्याबद्दल बोलले की त्याबद्दलच्या भावना, द्वेष, मत्सर उफाळून येतो हे अगदी मान्य! पण म्हणून आपणही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपली कर्मे वाढवून घ्यायची की त्यातून वेगळा मार्ग शोधायचा हे आपण आपले ठरवायचे आहे. कधीतरी एखादा शब्द बोलणे आणि जिभेला फक्त निंदा करायची सवय असणे ह्यात फरक आहे. त्याच्या आहारी जाऊ नये. आयुष्याच्या अखेरी शनी महाराज आहेतच मग हिशोब करायला!
आज जीवन अत्यंत आव्हानात्मक आहे. सकाळी घराबाहेर पडलेला माणूस घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागलेला असतो. समाजात असून नसल्यासारखे वागणे हे परमेश्वरी आव्हान आहे आणि ते स्वीकारण्याचे धाडस करायला पाहिजे. पूर्वीच्या काळी स्त्रिया जात्यावर दळताना ओव्या, श्लोक म्हणत असत ते ह्याचसाठी. कुणीही चार डोकी जमली की सुरु! पण त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो, हे विसरून चालणार नाही. घराच्या उंबरठ्याच्या आत आपले जग आहे आणि ते किती अनमोल आहे ते आपल्याला माहिती आहे . तिथे गोमुत्र शिंपडून, पूजा व्रते करून वास्तू शुद्ध होईल पण जोवर मनाचे पावित्र्य साधता येणार नाही तोवर सर्व व्यर्थ आहे.
Khandoba Navratra 2025: आजपासून ६ दिवस न चुकता म्हणा हे खंडोबाचे प्रासादिक स्तोत्र!
प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी तसेच कुणाचा किती राग करावा, द्वेष करावा त्याला सुद्धा असावी. कारण त्याने आपलेच नुकसान होते. कुणाचे मन दुखवू नका त्याने आपलेच भोग वाढणार आहेत तेही न संपणारे. पुढील अनेक जन्मांचे पाप आत्ताच जन्माला घालत आहोत आपण हाही विचार केला पाहिजे.
आपले संत वांग्मय वाचले तर मनुष्याने जीवन कसे जगावे हेच सांगितलेले आहे. पण आपल्याला सोशल मिडीयाशिवाय वेळ कुठे आहे? अर्थात तीही काळाची गरज आहे, पण अंतर्बाह्य शुद्धीकरणासाठी नामसुद्धा तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा कितीतरी अधिक महत्वाचे आहे.
तुकाराम महाराज आपली शेंडी झाडाला बांधून ठेवत, कारण झोप येऊ नये आणि नामस्मरणाची शृंखला खंडित होऊ नये. इतकी जिद्द ठेवावी लागते तेव्हा कुठे काकणभर सुधारणा होते अन्यथा सर्व फोल आहे.
चला तर मग आज मार्गशीर्ष शुभारंभ, निदान प्रयत्न तरी करुया. अनेक जण बोलत नाहीत, पण आपला द्वेष, पराकोटीचा मत्सर कृतीतून दाखवतात तेही तितकेच अयोग्य आहे. अनेकदा आपल्याला मिळालेले अपयश आणि त्याच वेळी दुसऱ्याचे सुख, प्रगती बघवत नाही आणि त्यातून इर्षा, मत्सर निर्माण होतो पण त्यामुळे आपली प्रगती होणार आहे का? उलट अनेक आजार मागे लागतात. जीवन अधोगतीला जाते.
मार्गशीर्ष म्हणजे फक्त लक्ष्मीला आवाहन आणि तिचे पूजन नाही तर विष्णूचे पूजसुद्धा झाले पाहिजे. त्यामुळे गुरुवारी पूजेच्या आधी विष्णूसहस्त्रनाम सुद्धा म्हणावे. लक्ष्मी विष्णू पूजन करावे. अवांतर बोलणे टाळावे. थंड पाण्याची बाटली, गहू, तांदूळ, साखर, तूप हा शिधा, रोजची भाजी, धान्य अशा अनेक गोष्टी या महिन्यात गरजूंना दान कराव्यात. देवळात हळद कुंकू दान करावे. अनेक स्त्रिया लावतील आणि आपोआप आपल्याकडून हळदी कुंकू होईल! देवीला कुंकुमार्चन, विष्णूला पवमान, अभिषेक, दत्तबावनी, दुर्गा सप्तशती, हनुमान चालीसा, आपल्या कुलस्वामिनीचा जप आणि कुलाचारांचे पालन करत मार्गशीर्ष साजरा करावा.
प्रपंच करताना परमार्थ वेगळा करायची गरजच नाही. आपले नित्य कर्म करत असताना घेतलेले नाम हेच मोक्षाकडे नेणारे आहे आणि समाधानाची अमर्यादित दालने सुद्धा उघडणारे आहे, करून बघा आणि प्रचीती जरूर कळवा. नाहीतर आयुष्य संपून जाईल पण समाधान मिळणार नाही.
आपल्यातील हे परिवर्तन नोकरी, अडकलेला पैसा, विवाह, सौख्य, आजारपण ह्या सर्वा सर्वातून सहीसलामत आपल्याला बाहेर काढण्यास समर्थ आहे, हे नक्की! तेव्हा शुभस्य शीघ्रम! एका संतावाचून विचारांचे परिवर्तन कुणी न करू शके आण , सत्य एक त्यांनाच कळे...!
ओम नमो भागवते वासुदेवाय |
ओम श्री महालक्ष्म्यै माताय्ये नमः|