क्रोधी नाम संवत्सर सुरू झालंय; तापट डोक्याच्या लोकांनी भगवद्गीतेतला 'हा' श्लोक लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 03:38 PM2024-04-12T15:38:18+5:302024-04-12T15:38:46+5:30

९ एप्रिल रोजी गुढीपाडवा होता आणि त्याच दिवशी क्रोधी नाम संवत्सर सुरु झाले, ते आता पुढच्या गुढीपाडव्याला बदलेल. तोवर या श्लोकाची मदत होईल!

Krodhi Naam Samvatsara has started; Short tempered People remember this verse from Bhagavad Geet! | क्रोधी नाम संवत्सर सुरू झालंय; तापट डोक्याच्या लोकांनी भगवद्गीतेतला 'हा' श्लोक लक्षात ठेवा!

क्रोधी नाम संवत्सर सुरू झालंय; तापट डोक्याच्या लोकांनी भगवद्गीतेतला 'हा' श्लोक लक्षात ठेवा!

चैत्र शुद्ध प्रतिपदेला संवत्सर बदलते. प्रत्येक संवत्सराचे वेगवेगळे नाव असते. या नावाचा एरव्ही उल्लेख होत नसला तरी त्याचा प्रभाव वर्षभर टिकतो. अशातच यंदाचे वर्ष क्रोधी नाम संवत्सराचे आहे. नावावरूनच त्याचा प्रभाव आपल्याला लक्षात येईल. या वर्षभरात क्रोधाचे प्रमाण वाढेल. स्त्री-पुरुषांच्या तामसी भावना बळावणे, विकारवशता वाढणे,अगदी धार्मिक व्यक्तींच्याही मनाचे संतुलन ढासळणे,श्रध्दा,निष्ठा कसोटीला लागणे,उच्च ध्येयापासून विचलित होणे ,नास्तिकता वाढणे असे घडू शकते म्हणून आपली साधना प्रबळ करावी. त्याबरोबरच भगवद्गीतेत दिलेला श्लोक कायम लक्षात ठेवावा!

असे म्हणतात, की आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे भगवद्गीतेत सापडतात. संतापावर आवर घालण्याचाही उपाय त्यात आहे का, याचा शोध घेतला आणि उत्तर समोर आले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, 

ध्यायतो विषयान पुंस: संगस्तेषूपजायते,
संगात संजायते काम: कामात् क्रोधोSभिजायते।

नानाविध विषयांमध्ये गुंतून राहणाऱ्या मनुष्याला विषयांची आसक्ती लागते. विषय आत्मउन्नतीचे असतील तर ठीक. अन्यथा वाममार्गाकडे पावले वळली, की  विषय मिळवणे, हे ध्येय बनते. ते ध्येय गाठण्यासाठी असंगाशी संग, म्हणजेच अयोग्य व्यक्तीशी संग करण्याचीही मनाची तयारी होते. त्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून आपली सदसद्विवेक बुद्धी नष्ट होते आणि दुसऱ्याच्या विचाराने विचार करण्याची सवय लागते. एवढे करूनही आपल्याला हवी असलेली गोष्ट प्राप्त झाली नाही, की क्रोधाची मूळे मनात खोलवर रुजतात आणि...

क्रोधात भवति संमोह: संमोहात स्मृती विभ्रम:
स्मृतिभ्रंशाद बुद्धीनाशो, बुद्धीनाशात् प्रणश्यति।।

क्रोधामुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहू लागतो. इतरांचा मत्सर करू लागतो. आपली मूळ ओळख, मूळ व्यक्तीमत्त्व, मूळ स्वभाव विसरून रागाच्या भरात गैरवर्तन करू लागतो. क्रोधाचे संमोहन एवढे असते, की मनुष्याला स्वत:च्या स्मृतीचा संभ्रम पडू लागतो. रागाच्या भरात वाट्टेल तसे वागतो आणि बरेच काही कमावण्याच्या नादात जे हातात आहे, तेही गमावून बसतो. 

एक उदाहरण बघू. आई मुलाला बाजारात घेऊन जाते. तो मुलगा आईचे बोट धरून नाचत-बागडत बाजारात जातो. वाटेत त्याला खाऊचे दुकान दिसते. तो आईकडे खाऊसाठी हट्ट करतो. आई त्याला नकार देते. तो घुश्श्यातच जड पावलांनी आईबरोबर पुढे पुढे चालतो. एव्हाना त्या शुल्लक चॉकलेटने मुलाच्या डोक्यात घर केले असते, वरून ते मागितल्यावर लगेच मिळाले नाही, याचा रागही असतो. मुलगा ते लक्षात ठेवतो. 

वाटेत पुढचे दुकान लागते. मुलगा पुन्हा हट्ट करतो. आई त्याला डोळ्यांनी दटावते. मुलाला आणखी राग येतो. तो खाऊसाठी अडून बसतो. आईचा हात झटकतो. जोरजोरात रडायला सुरुवात करतो. आई त्याला समजावते. रागे भरते. मुलगा आणखीनच जोरात रडून भर रस्त्यावर फतकल मारून बसतो. गर्दीचे लक्ष जाते. लोक बघतात, हसतात, हे पाहून आईची चरफड होते. ती मुलाला रागाच्या भरात एक धपाटा घालते आणि हाताला धरून फरफटत घेऊन जाते. चॉकलेट तर दूरच, पण मुलगा धपाटा खाऊन वरून भर रस्त्यात स्वत:चाच अपमान करून घेतो. आपले चांगले कपडे खराब करून घेतो आणि आईचा राग ओढावून घेतो, ते वेगळेच! 

तात्पर्य, शहाणा,समजुतदार मुलगा एका छोट्याशा खाऊपायी स्वत:ची ओळख गमावून बसतो आणि रागाच्या भरात आईला अद्वातद्वा बोलू लागतो. याउलट त्याने संयम ठेवला असता, तर त्याची समजुतदारी पाहून आईनेच त्याला खाऊ घेऊन दिला असता. 

परंतु, एवढी समजुतदारी ना मुलामध्ये असते ना आपल्यामध्ये. म्हणून तर पावलोपावली राग राग करून आपण स्वत:ची किंमत करून घेतो आणि रागाच्या भरात आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान करून बसतो. 

यावर उपाय एकच आहे, ज्याक्षणी राग येईल, त्याक्षणी प्रतिक्रिया देणे टाळावे आणि डोकं थंड व मन शांत झाल्यावर प्रतिसाद द्यावा. असे केल्यामुळे, रागाची तीव्रता कमी होते आणि मनात उठलेल्या अनेक वादळाचा क्षणात निचरा होतो. म्हणून क्रोधाचा क्षण आवरणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तो आवरणे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.

आयुष्यात कितीही टोकाचे प्रसंग आले तरी त्यातून निभावण्याची ताकद उपासनेत असते, यासाठी पुढील गोष्टी आवर्जून करा. 

१) क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी नामस्मरण वाढवा.
२) क्षमाशील वृत्ती वाढवून अंगी शांती बाणवा.
३) अनैतिक गोष्टी करू नका.
४) वादविवाद टाळा. एकमेकांविषयीचे गैरसमज दूर करून स्नेहभाव वाढवा.सारे विसरून जा.
५) सामुदायिक उपासना,ज्ञानेश्वरी,देवीमाहात्म्य, गीता पठण,स्तोत्रपठण असे कार्यक्रम आयोजित करा
६) सर्व लोभांपासून लांब रहा
७) सर्वत्र समजुतीचे धोरण ठेवा.
८) मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करा.
९) आहार विहाराची काळजी घ्या.
१0) घरांतील वडीलधा-यांचा नेहमी मान ठेवा,आणि त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या.
११) या वर्षी जमेल तेवढ्या वेळा कुलदेवता आणि कुलस्वामीनीचे दर्शन घ्या.
१२) घरात लघुरुद्र पवमानसूक्त,वरद शंकर महापूजा आयोजित करा.
1३) शक्य असेल तेवढे अन्नदान करा.
1४ ) घरात रोज पूजा करा.देव पारोसे ठेवू नका.
१५) पितरांच्या तिथीला श्राध्द व सर्वपितरीला तर्पण करायला विसरू नका.

Web Title: Krodhi Naam Samvatsara has started; Short tempered People remember this verse from Bhagavad Geet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.