June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:53 IST2025-06-16T16:52:14+5:302025-06-16T16:53:14+5:30
June Panchak 2025 Do and Donts: १६ ते २० जून रोजी पंचक आहे, हा काळ अशुभ का मानला जातो? या कालावधीत काय करावे आणि काय टाळावे ते जाणून घ्या.

June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
पंचक हा शब्द आपल्या ऐकण्यात येतो ते एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर. जन्मतिथी जशी महत्त्वाची तशी मृत्यूतिथीही आपल्याकडे महत्त्वाची ठरते. एखाद्याचा मृत्यू पंचक योगावर झाला असता पाठोपाठ आणखी पाच जणांची मृत्यू वार्ता ऐकीवात येते असे म्हणतात. त्यादृष्टीने अंत्ययात्रेत विशिष्ट विधीदेखील पार पाडला जातो, जेणेकरून आणखी काही अघटित घडू नये हा त्यामागचा हेतू असतो. त्यामुळे पंचकाचा काळ अशुभ मानला जातो.
दर महिन्यात हा पाच दिवसांचा कठीण काळ येतो. सध्या अनेक प्रकारचे घात अपघात सभोवताली होत असल्याने आणखी काही वाईट घडू नये यादृष्टीने ज्योतिष अभ्यासकांकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो.
जूनमधील पंचक कालावधी :
जूनमध्ये सोमवार १६ जून रोजी दुपारी १.१० मिनिटांनी पंचक सुरु झाले असून शुक्रवार दिनांक २० जून रोजी रात्री ९.४५ मिनिटांनी पंचक समाप्ती होईल. या कालावधीत कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊ.
पंचक म्हणजे काय?
पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते. काही मान्यतांनुसार, या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा पाचपट प्रभाव पडत असतो. खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ३६० अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या ३०० डिग्री ते ३६० डिग्री मध्य भ्रमणाच्या कालावधीला पंचक मानले जाते. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते.
पंचक काळातील मृत्यू मानतात अशुभ
पंचक लागण्याची वेळ, मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केले जात नाही. पंचक कालावधी हा अमंगलाचे सूचक मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ते अशुभ मानले जाते. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते.
पंचक काळात काय टाळावे? काय करू नये?
- ज्योतिषानुसार, सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा भिन्न असतो. पंचक कोणत्या दिवशी लागते, यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचे सांगितले जाते.
- पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्यांचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो. काहीवेळा धनलाभाचे योगही प्रबळ होऊ शकतात. याशिवाय वाहन खरेदी, गृह प्रवेश, शांती पूजन, मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्ये करणे पंच कालावधीत शुभ मानली गेली आहेत.
- पंचक सर्व कार्यांसाठी अशुभ नसते, तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभ मानले जाते. या कालावधीत यात्रा करणे, मुंडन कार्य, व्यापार आदी कार्यांसाठी पंचक शुभ मानले गेले आहे. तसेच साखरपुडा समारोह, विवाह आदी शुभ कार्ये पंचक कालावधीत केली जाऊ शकतात.
- पंचक कालावधीत काही कार्ये करणे निषिद्ध मानले गेले आहे. पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये. घराच्या छताच्या दुरुस्तीचे किंवा नवीन बांधकाम करू नये. पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानले गेले आहे. कोणात्याही प्रकारच्या इंधनाचे भंडारण करू नये, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- अग्नि पंचक काळात शुभ कार्य करू नये, असे सांगितले जाते.
- मुहूर्त-चिंतामणीनुसार, पंचक दरम्यान दक्षिणेकडे प्रवास करू नये. परंतु, प्रवास करणे अत्यावश्यकच असेल, तर हनुमंतांचे पूजन करावे, नामस्मरण, मंत्रांचे जप करावे आणि प्रवासाला निघावे, असा एक उपाय काही जणांकडून सांगितला जातो.
( सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे)