राग येणे ही तशी सामान्य बाब आहे. परंतु काही लोकांच्या नाकावर एवढा राग असतो की कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होतात. या लोकांना त्यांच्या कामात किंवा जीवनात कोणताही हस्तक्षेप आवडत नाही. जर कोणी त्यांच्या कामात छोटीशी चूक केली किंवा कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. हे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा सहज रागवतात. या लोकांशी जुळवून घेणे थोडे कठीण आहे. हा केवळ त्यांच्या स्वभावाचा भाग नाही, तर त्यांच्या राशीचाही परिणाम असतो असे ज्योतिषशास्त्र सांगते. बारा राशींपैकी तीन राशी शीघ्र कोपी म्हणून ओळखल्या जातात. त्या तीन राशी कोणत्या ते जाणून घ्या!
कन्या: कन्या राशीचे लोक कामाच्या बाबतीत टापटीप असतात. त्यांच्याशी संबंधित कामात हलगर्जीपणा केलेला त्यांना अजिबात चालत नाही. प्रत्येक गोष्ट ही त्यांना त्यांच्या मनासारखीच हवी असते. कामातली उणीव त्यांना चालत नाही. गोष्टी मनासारख्या घडेपर्यंत त्यांच्या नाकावरचा राग कमी होत नाही!
सिंह: सिंह राशीच्या लोकांमध्ये जन्मजात गर्व आणि अभिमानाची भावना असते. त्यांना असे वाटते की लोकांनी नेहमी त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. जर त्यांना विशेष वागणूक मिळाली नाही तर त्यांना तो अपमान वाटतो. यांना लोकांशी जुळवून घेता येत नाही, पण लोकांनी आपल्याशी जुळवून घ्यावे अशी त्यांची अवास्तव अपेक्षा असते.
धनु : धनु राशीच्या लोकांना बदल आवडत नाहीत. त्यांना त्यांची शिस्तबद्ध जीवनपद्धती आवडते. त्यात कोणाची लुडबुड चालत नाही. त्यात कोणी बदल केला तर त्यांचा पारा चढतो. या व्यतिरिक्त त्यांना आपलेच म्हणणे खरे करण्याची सवय असते. या स्वभावामुळे ते लोकांना दुखावतात आणि लोक बोलत नाहीत म्हणून हे पुन्हा त्यांच्यावरच रागवतात.