हनुमान जन्मोत्सव २०२६: सलग ११ दिवस उपाय करा, मारुतीराया काही कमी पडू देणार नाही, मंगलच होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:27 IST2026-03-30T13:24:18+5:302026-03-30T13:27:22+5:30
Hanuman Jayanti 2026: ज्या रामभक्तांवर काही संकट येईल ते निवारणासाठी स्वतः धावून येण्याचे हनुमंतांचे वचन असल्याचे सांगितले जाते.

हनुमान जन्मोत्सव २०२६: सलग ११ दिवस उपाय करा, मारुतीराया काही कमी पडू देणार नाही, मंगलच होईल!
Hanuman Jayanti 2026: मराठी नववर्षात राम नवरात्र झाले की, चैत्र पौर्णिमेला रामाच्या परमभक्ताची म्हणजेच श्रीहनुमानाची जन्मतिथी येते. प्रभू रामचंद्राचे आणि हनुमानाचे नाते असे त्यांच्या जन्मापूर्वीपासूनचे आहे आणि ते नाते अनंत काळपर्यंत चिरकाल टिकणारे आहे. मारुतीराया चिरंजीव असल्यामुळे संपूर्ण भारतात हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. हनुमंतांच्या बलभीम रुपाचे स्मरण केले जाते. पूजन केले जाते. या दिवसापासून काही विशेष उपाय करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. जाणून घेऊया...
मारुतीचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी झाला. मारुतीचा जन्म भारतात सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला ठिकठिकाणच्या मंदिरात पहाटेपासून कीर्तन सुरू होते आणि सूर्योदयाच्या वेळी मारुतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. अनेक प्रकारच्या आपत्तींच्या विनाशासाठी म्हणून हनुमंताची उपासना केली जाते. बलोपासना वाढविण्यासाठी, शरीर धष्टपुष्ट आणि चपळ होण्यासाठी मारुतीची उपासना आवश्यक असल्याचे म्हटले जाते. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य याची गरज कलियुगात महत्त्वाची मानली गेली आहे. बलभीम मारुतीचे वैशिष्ट्य काय? एक महत्त्वाची गोष्ट अशी की, मारुती कधीही पराभूत झालेला नाही. अवघड प्रसंगी त्याला आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि तो कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतो.
मारुतीराया काही कमी पडू देणार नाही, मंगलच होईल!
पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त! ज्या रामभक्तांवर काही संकट येईल त्या संकट निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे हनुमंतांचे वचनच आहे. आयुष्यातील असेच कोणत्याही प्रकारचे संकट असेल तर त्याच्या निवारणासाठी काही उपाय करावेत, असे म्हटले जाते. गुरुवार, ०२ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सव आहे. या दिवसापासून पुढे सलग ११ दिवस काही उपाय करणे शुभ फलदायी, लाभदायी ठरू शकते, असे म्हटले जात आहे. तो उपाय म्हणजे हनुमान चालीसा हे स्तोत्र! संत तुलसी दास यांनी हनुमान चालिसाचे स्तोत्र लिहिले आहे. हे स्तोत्र आपण नियमित म्हणत असाल तर उत्तमच आहे, मात्र उपाय म्हणून या स्तोत्राचा वापर करणार असाल तर पुढील नियम ११ दिवस आवर्जून पाळा. हनुमान चालीसा ही केवळ मारुती रायाची उपासना नाही, तर हे इच्छापूर्ती आणि संकट निवारण स्तोत्र आहे. जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पुढील नियमांचे पालन करा.
- आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी. दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही. स्वउत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रगट करावी.
- हा उपक्रम ब्रह्ममुहूर्तावर पार पाडायचा असतो. म्हणून पहाटे ४ ते ६ दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी.
- हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं वाहावीत आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
- शांत चित्ताने हनुमान चालीसा स्तोत्र पठण सुरू करावे.
- इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग ११ दिवस ११ वेळा म्हणावे.
- अकराव्या दिवशी ११ वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यावर 'बजरंग बाण' हे स्तोत्र म्हणावे. कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.