Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:30 IST2025-06-20T13:29:56+5:302025-06-20T13:30:57+5:30
Pandharpur Ashadhi Wari Information Marathi: प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हणतात, या वारीत जाण्याने नेमकं मिळतं तरी काय? चला जाणून घेऊ!

Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
>> सर्वेश फडणवीस
६ जुलै रोजी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2025) आहे आणि त्यानिमित्ताने पंढरीरायच्या भेटीसाठी वैष्णवांचा थवा पंढरपूरला वारीसाठी(Ashadhi Wari 2025) निघाला आहे. त्यात ज्ञानोबा, तुकाराम, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई या संतांची मांदियाळीही पालखी रूपात सहभागी होते तेव्हा आनंद दुणावतो. या सोहळ्याचा शब्दानुभव घेऊया.
वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. गेली साडेसातशेहून जास्त वर्षे ' वारी ' अव्याहतपणे सुरू आहे. भक्तांसाठी दिंडी, भजन, कीर्तन, रिंगण, खेळ याचसोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आळंदीहून प्रस्थान ठेवलेली श्रीसंत ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाची उत्पत्ती करण्याऱ्या दयाघन पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे. आपणही सगळे या पालखी सोहळ्यात सामाविष्ट होतो आहे. आपण प्रत्येकाने अशी भावना करायची की जणू माउलींची पालखी माझ्या खांद्यावर आहे आणि रामकृष्णाहरीचा गजर करत आपल्या जागेवरून व्हाया आळंदी ते पंढरपूरला जायचे आहे. कारण या परंपरचे, महाराष्ट्र साडेसातशेहुन अधिक वर्षापासून अत्यंत निष्ठापूर्वक आणि संपूर्ण समर्पण भावनेने आचरण करत आहे. लाखो वारकरी, हजारो मृदुंग, हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पाऊले जेव्हा पंढरीच्या वाटेने चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदाने कोंदून जाते. मैलोगणिक तो नामध्वनी, पुढे आपल्या कानावर पडत असतो आणि लक्षावधी वारकरी ऊन, पाऊस, वारा, वादळ, तहान, भुकेची पर्वा न करता मार्गक्रमण करीत असतात.
कायम वाटतं वारी म्हणजे मानवा-मानवांमध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावे, समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी आणि या उच्चतम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी आहे.
वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं, वारी म्हणजे देव-भक्त भेटीतील आतुरता, वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास, वारी म्हणजे जीवशिवाच्या मिलनाची प्रक्रिया, वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास, वारी म्हणजे देव शोधता-शोधता स्वत:च देव होऊन जाणं, वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकांप्रति जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे अठ्ठावीस उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे. "वारी" हा भगवद्भक्तीचा नुसता आविष्कार नसून, भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. परब्रह्माला डोळ्यांनी पाहत विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी आहे.
याच वारीत वारकरी भजन, कीर्तन, ओव्या,अभंग म्हणत पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवतात आपणही या माध्यमातून एक तरी ओवी अनुभवत या वारीत सामील होण्याचा प्रयत्न करूया. संत साहित्यात हजारो ओव्या आणि अभंग समाविष्ट आहेत. अशाच काही ओव्यांचा वारीच्या निमित्ताने रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात,
कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरीनाथ बोलावितो ॥ १ ॥ मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची ॥ २ ॥ निलाजिरें चित्त करितें तळमळ । केधवां देखती मूळ आलें डोळे || ३ || तुका म्हणे कई भाग्याची उजरी । होईल पंढरी देखावया ॥ ४ ॥
अर्थात पंढरीनाथ तुला बोलावितो आहे, तू चल', अशी शुभवार्ता मी कोणाच्या तोंडाने ऐकेन ?॥ १ ॥ मग मी संसाराची आशा, अपकीर्तीची भीती न बाळगता सत्वर गतीने पंढरी माहेराची वाट धरीन ॥ २ ॥ माझे चित्त लोक लाजेची पर्वा न करता पंढरीहून पंढरीनाथाचे बोलावणे कधी येईल या आशेने वाटेकडे दृष्टी लावून तळमळत राहिले आहे ॥ ३ ॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, माझे पंढरी पाहाण्याचे सौभाग्य कधी उजळणार काही कळत नाही ॥ ४ ॥ हीच त्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी सकलसंतांच्या मनातली भावना आहे.
'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय'