बीडमध्ये चाललंय तरी काय... अपहरण करून दारू पाजली, मग सात तास गुरासारखे मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:09 IST2025-05-22T13:09:45+5:302025-05-22T13:09:56+5:30
परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये चाललंय तरी काय... अपहरण करून दारू पाजली, मग सात तास गुरासारखे मारले
बीड : ओळखीच्याच एकाने चहा पाजतो, असा बहाणा करून दुचाकीवरून दूर नेले. तेथे पाच ते सहाजणांनी दारू पाजली. नंतर अपहरण करून सात तास बेदम मारहाण केली. यात जखमीच्या डोक्यात सात टाके पडले असून, अंगावर सर्वत्र व्रण उमटले आहेत. हा प्रकार १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता घडला. यातील जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
आप्पा काशिनाथ राठोड (वय ४५, रा. जिवणापूर, ता. माजलगाव) असे जखमीचे नाव आहे. आप्पा हे गोरसेना संघटनेत सक्रिय आहेत. गावातीलच रमेश पवार नामक व्यक्तीने भाजपशी हातमिळवणी केल्याने त्याला पद देण्यास आप्पा यांनी विरोध केला. याचा राग मनात धरून ओळखीच्या दोन लोकांना पाठवून आप्पा हे पात्रूडवरून गावी जात असताना चहा पाजतो, असे सांगून दुचाकीवर बसवले. टालेवाडी फाटा येथे नेले. तेथे रमेश पवार व इतर पाच ते सहा लोक होते. तेथे आप्पाला दारू पाजली. त्यानंतर डोक्यात दांड्याने मारहाण केली.
१८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता अपहरण करून पहाटे ३ वाजता सोडले. यादरम्यान खूप मारहाण करून व्हिडीओ बनविले. दुसऱ्या दिवशी मी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गेल्यावर त्यांनी पत्र दिले; परंतु अद्याप जबाब घ्यायला कोणी आले नाहीत. आप्पा राठोड, जखमी