विद्युत जोडणी तोडल्याने बदडले लाईनमनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:13 IST2019-03-02T00:12:56+5:302019-03-02T00:13:27+5:30
थकीत वीज बिलापोटी विद्युत जोडणी तोडल्याच्या रागातून तिघांनी महावितरणच्या लाईनमनला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी बीड शहरात घडली.

विद्युत जोडणी तोडल्याने बदडले लाईनमनला
बीड : थकीत वीज बिलापोटी विद्युत जोडणी तोडल्याच्या रागातून तिघांनी महावितरणच्या लाईनमनला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी बीड शहरात घडली.
थकीत वीजबिल ग्राहकांची विद्युत जोडणी तोडण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सतीश मुळूक, दत्ता हगारे, शेख अमीर, शेख युसुफ आणि लाईनमन विष्णू दादाराव तांदळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांनी शहरातील गणपती नगर भागातील विष्णू राठोड याच्या घरची विद्युत जोडणी बील न भरल्यामुळे तोडली. त्यामुळे चिडलेल्या राठोडने सर्व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि निघून गेला. त्यानंतर दुपारी त्याने लाईनमन विष्णू तांदळे यांना फोन केला आणि वीज बिल जमा करण्याच्या बहाण्याने सायंकाळी ६ वाजता बार्शी रोडवरील एका पानटपरी जवळ बोलावून घेतले. त्यामुळे महावितरणचे हे सर्व कर्मचारी तिथे गेले असता विष्णू आणि त्याच्या सोबतच्या दोघांनी आम्ही बिल भरणार नाहीत, तरीसुद्धा आम्ही जोडणी करून दे, असे म्हणत त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरु केली. त्यानंतर त्या तिघांनी लाईनमन तांदळे यांना बेदम मारहाण करत अंगावरील गणवेश फाडला. याप्रकरणी विष्णू तांदळे यांच्या फिर्यादीवरून विष्णू राठोड आणि अन्य दोघांवर शिवाजीनगर पोलिसात शासकीय कामकाजात अडथळा आणून कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.