तुरीचे खळे सुरु असताना मळणीयंत्रात अडकून शेतकरी महिलेचे झाले तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 17:05 IST2023-01-13T17:04:14+5:302023-01-13T17:05:22+5:30
मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू; गेवराई तालुक्यातील खामगाव येथील घटना

तुरीचे खळे सुरु असताना मळणीयंत्रात अडकून शेतकरी महिलेचे झाले तुकडे
गेवराई (बीड) : तालुक्यातील खामगाव येथील शेतात तुरीचे खळे सुरु असताना एका ३८ वर्षीय शेतकरी महिलेचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली होती. संगीता शिवाजी पवार असे मृत महिलेचे नाव आहे. निष्काळजीपणे मळणीयंत्र चालवल्याने याप्रकरणी चालकावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहागड ( ता. अंबड जि. जालना) येथील पवार कुटुंबाचे गेवराई तालुक्यातील खामगाव येथे शेत आहे. बुधवारी शेतात तुरीचे खळे करण्यासाठी शिवाजी पवार, पत्नी संगीता आणि दोन मुलांसह शेतात आले होते. मळणी यंत्र सुरु असताना धक्का लागल्याने संगीता मळणी यंत्राच्या पंख्याला अडकल्या. काही क्षणातच संगीता यांच्या शरीराचे तुकडे होऊन जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा मुलगा अजय शिवाजी पवार ( २० ) याच्या फिर्यादीवरून मळणी यंत्र चालक संदिप भारत उधे ( रा. खामगाव) याच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.