अनैतिक संबंधातून हत्येचा बनाव, एक महिला तयार केली; संतोष देशमुख प्रकरणात मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:11 IST2025-02-18T17:11:05+5:302025-02-18T17:11:35+5:30
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे दाखवण्याचा कट होता, असा आरोप धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला आहे.

अनैतिक संबंधातून हत्येचा बनाव, एक महिला तयार केली; संतोष देशमुख प्रकरणात मोठा गौप्यस्फोट
Santosh Deshmukh Murder Case : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले, पण अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस(शप)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमोर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी खळबळजनक दावा केला आहे. महिलेसोबत अवैध संबंधातून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. यासाठी एक महिलाही तयार ठेवली होती. पण, गावातील तरुणांनी अँब्युलन्सचा पाठलाग केला आणि डाव उलथून लावला, असा खळबळजनक दावा ग्रामस्थांनी केला आहे.
मयत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख, यांनीदेखील या आरोपाला दुजोरा दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा कट खुद्द बीड पोलिसांनीच रचला होता, संतोष देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आली, पण गावकऱ्यांच्या जागरुकतेमुळे पोलिसांचा हा कट उधळून लावण्यात आला, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.
असा आहे त्या दिवशीचा घटनाक्रम...
धनंजय देशमुखांनी त्या दिवशीचा सगळा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की, संतोष आण्णांना दवाखान्यात न्यायचे आहे, असे एका सहकाऱ्याने फोनवर सांगितले. पण पोलिसांनी त्यावेळी काय घडले, याची माहिती कुणालाही लागू दिली नाही. संतोष देशमुखांना घेऊन जाणारी अँब्युलन्स अचानक कळंबच्या दिशने निघाली. केजमध्ये रुग्णालय आणि पोलिस स्टेशन असूनही कळंबच्या दिशेने अँब्युलन्स का नेली जात आहे, असा प्रश्न त्यावेळी तरुणांना पडला. संशय आल्यामुळे तरुणांनी त्या अँब्युलन्सचा पाठलाग केला आणि पोलिसांचा हा कट अयशस्वी ठरला.
कळंबमध्ये बाई तयार होती
सुरेश धसांनी हा मुद्दा सभागृहात मांडला होता. त्यावेळीही त्यांनी कळंबमध्ये एक महिलेला तयार ठेवण्यात आल्याचे आमि आणि हत्येला वेगळे वळण देण्याचा कट असल्याचा आरोप केला होता. माणसांना मारायचे, हातपाय मोडायचे, रक्तबंबाळ करायचे हे आरोपींचे काम. त्यांनी कळंबमध्ये एका महिलेले पैसे देऊन तयार ठेवले असायचे. मग छेडछाडीतून त्या व्यक्तीला मारण्यात आल्याचे चित्र निर्माण करायचे आणि त्यानंतर ती महिला विनयभंगाची केस करायची. असे प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायचे. या प्रकरणात कुठे केस दाखल करुन घेतली जायची नाही. उलट समाजातून त्या व्यक्तीला उठण्याची वेळ यायची. समाजासाठी लढणाऱ्या होतकरू तरुणाला बदनाम करण्याचा पोलिसांचा आणि आरोपींचा कट होता, असा आरोपही धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला.