हृदयद्रावक! पुणे कृषी महाविद्यालयात वॉटर फिल्टरचा शॉक लागून आष्टीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:27 IST2026-03-25T19:26:43+5:302026-03-25T19:27:55+5:30
पुण्यात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली, आष्टीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

हृदयद्रावक! पुणे कृषी महाविद्यालयात वॉटर फिल्टरचा शॉक लागून आष्टीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
कडा (जि. बीड): पुणे येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये वॉटर फिल्टरचा जोरदार शॉक लागल्याने गंभीर जखमी झालेल्या चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगण, ता. आष्टी) या विद्यार्थ्याचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली. बुधवारी सकाळी डोंगरगण येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेमकी घटना काय?
चैतन्य हा पुणे कृषी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून सध्या तो तिथेच प्रथम वर्ष 'एबीएम' (ABM) शाखेत शिक्षण घेत होता. १४ मार्च रोजी रात्री ८ ते ९ च्या सुमारास मेसमध्ये जेवणापूर्वी पाणी पिण्यासाठी तो फिल्टरजवळ गेला असता, अचानक विजेचा मोठा धक्का लागून तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी रात्री २४ मार्च रोजी त्याची प्राणज्योत मालवली.
प्रशासकीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
एका बाजूला डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना, पुण्यासारख्या नामांकित महाविद्यालयाच्या मेसमध्ये विजेची उपकरणे असुरक्षित कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. चैतन्यच्या पश्चात वडील, दोन भाऊ आणि दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. एका होतकरू विद्यार्थ्याचा असा अंत झाल्याने कृषी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असून, या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.