सलग दोन दिवस वीज पुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:02+5:302021-07-07T04:42:02+5:30
परळी : सोमवारी रात्री शहरातील वीज पुरवठा विस्कळीत झाला असून सर्वत्र अंधारच अंधार होता. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास वीज ...

सलग दोन दिवस वीज पुरवठा विस्कळीत
परळी : सोमवारी रात्री शहरातील वीज पुरवठा विस्कळीत झाला असून सर्वत्र अंधारच अंधार होता. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाला पण मंगळवारी पुन्हा सकाळी वीज पुरवठा विस्कळीत झाला. दुपारपर्यंत वीज गूल झाली होती.
शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसातून अनेक वेळा वीज गूल होत असल्याने विजेवर चालणारी उपकरणे, पिठाच्या गिरण्या बंद पडत आहे. तसेच पंखे बंद पडत असल्याने घरात गरम होण्याचे प्रकार वाढले आहेत.
गेल्या तीन महिन्यात विजेच्या वाढत्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीच्या कारभाराविषयी परळीकरांमध्ये असंतोष दिवसेंदिवस वाढू लागला आहे. येथील वीज वितरण कार्यालयातील अधिकारी कामात निष्काळजी करत असल्याचा आरोप करत हयगयी करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब देशमुख यांनी केला आहे.
सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून वीज गूल झाली असून साडेनऊपर्यंत विजेचा पत्ता नव्हता त्यामुळे शहरात रात्रीचा अंधार होता. शहरातील सर्वच भागात वीज पुरवठा सुरळीत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे आधीच परळीकर त्रस्त आहेत. त्यातच वीज पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अधिकच त्रासून गेले आहेत याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले असून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विजेचा लपंडाव वाढला असल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबडकर म्हणाले की, सोमवारी रात्री शहरातील परिसरात लाईनमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागात रात्री पावणे दहा सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला.
भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा म्हणाले की, सोमवारी दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज पुरवठा विस्कळीत कशामुळे होतो, वीज वितरणाच्या झालेल्या शहरातील बोगस कामाची चौकशी करा, अशी मागणी राजेंद्र ओझा यांनी केली आहे.