परळीत ३०० वर्षांपूर्वीचे 'झुरळे गोपीनाथ' मंदिर; झुरळांच्या रूपात मंदिरात असतो गोपिकांचा वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:31 IST2025-08-14T15:30:05+5:302025-08-14T15:31:33+5:30
परळीतील 'झुरळे गोपीनाथ' मंदिराची वेगळी ओळख

परळीत ३०० वर्षांपूर्वीचे 'झुरळे गोपीनाथ' मंदिर; झुरळांच्या रूपात मंदिरात असतो गोपिकांचा वास
- संजय खाकरे
परळी : प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत, जुन्या परळीतील गणेशपार भागात एक अनोखे आणि प्राचीन असे सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे 'झुरळे गोपीनाथ' मंदिर आहे. हरी (भगवान विष्णू) आणि हर (प्रभू वैद्यनाथ) यांच्या हरिहर स्वरूपाचा अनुभव देणाऱ्या या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर झुरळे गोपीनाथांचे दर्शन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या दर्शनाशिवाय परळीची तीर्थयात्रा पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे, या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास असतो, अशीही एक अनोखी आख्यायिका आहे.
शहरातील गणेशपार येथील बडवे गल्लीतील या मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना दहा पायऱ्या उतरून दहा फूट खोल गाभाऱ्यात जावे लागते. या गाभाऱ्यात शालिग्राम पाषाणाची भगवान विष्णूंची चतुर्भुज मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म अशी आयुधे असून, छातीवर ऋषींच्या लाथेची खूण आहे. मूर्तीच्या पायाजवळ जय-विजय भालदार स्वरूपात विराजमान आहेत. बडवे कुटुंबातील अनिल बडवे आणि संजय बडवे हे कुटुंबीय पिढ्यानपिढ्या या मंदिराची सेवा करतात.
वर्षभर मंदिरात झुरळांचा वावर?
या मंदिराच्या नावामागे एक रोचक कथा आहे. एका बडव्याच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरातील विहिरीत माझी मूर्ती आहे. त्यानंतर खोदकाम केले असता ही मूर्ती सापडली. कलियुगात आपल्यासोबत राहण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोपिकांना झुरळांच्या रूपात राहण्याचा वर दिला, म्हणून या देवस्थानाला 'झुरळे गोपीनाथ' असे नाव पडले. विशेष म्हणजे या मंदिरात वर्षभर झुरळांचा वावर असतो. दर्शन घेताना सहसा ही झुरळे कोणालाही स्पर्श करत नाहीत; पण ज्यांच्या अंगावर ती पडतात, त्याला भाग्यवान मानले जाते. वेदमूर्ती रवींद्र महाराज वेताळ परळीकर यांच्या मते, या मंदिराच्या दर्शनाने आयुष्य वाढते, आरोग्य सुधारते आणि मनोकामना पूर्ण होतात.
मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज
परळी शहरातील अनेक मंदिराचा मागील काही वर्षांत जीर्णोद्धार झाला; परंतु या मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज असून, मंदिराच्या सभामंडपात पावसाळ्यात पाणी गळणे व भिंती ओलसरपणा येणे त्यामुळे भाविकांची गैरयोय होत आहे.
- संजय बडवे, पुजारी, झुरळे गोपीनाथ मंदिर, परळी