मायबाप सरकार, ‘लाडक्या लेकीं’ची सुरक्षा करा; राज्यात दररोज २४ जणी नराधमांच्या शिकार
By सोमनाथ खताळ | Updated: April 8, 2025 15:35 IST2025-04-08T15:32:38+5:302025-04-08T15:35:18+5:30
राज्यात सव्वाचार वर्षांत छेडछाड, अत्याचाराचे ३७ हजार गुन्हे दाखल

मायबाप सरकार, ‘लाडक्या लेकीं’ची सुरक्षा करा; राज्यात दररोज २४ जणी नराधमांच्या शिकार
बीड : केवळ ‘गुड टच, बॅड टच’ असे उपक्रम राबवून चालणार नाही तर १८ वर्षांखालील ‘लाडक्या लेकीं’च्या सुरक्षेसाठीही शासन, प्रशासन आणि सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे. २०२१ ते मार्च २०२५ पर्यंत राज्यात ३७ हजार गुन्हे दाखल असून, सरासरी दररोज २४ अल्पवयीन मुलींची छेड किंवा अत्याचार केला जात आहे.
सरकारकडून महिला, मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना आणून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर १५०० रुपये जमा करण्यात आले. काही लोकांनी याचे स्वागत तर काहींनी आरोप केले. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, त्या लाडक्या बहिणी, १८ वर्षांखालील लाडक्या लेकी राज्यात असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. या घटना केवळ कोणा एका सरकारच्या काळात थांबल्या आणि वाढल्या असे नाही. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, छेडछाडीच्या या घटना दिवसेंदिवसच वाढत चालल्या आहेत. कठोर कायदा केल्यानंतरही लहान मुली नराधमांच्या शिकार बनत आहेत.
संतापजनक! 'ती' अल्पवयीन पीडिता अनेकांची 'शिकार'; जबाबातून धक्कादायक माहिती उघड
बृहन्मुंबईत सर्वाधिक गुन्हे
राज्यात शहरे व जिल्ह्यांचा गुन्हे दाखलचा आढावा घेतला. यात सर्वात जास्त अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना बृहन्मुंबईमध्ये घडल्या आहेत. २०२५ या वर्षातही आतापर्यंत १००७ गुन्हे दाखल आहेत.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
१८ वर्षांखालील मुलीच छेड काढली किंवा अत्याचार केला तर बाल लैंगिक अत्याचार म्हणजेच पोक्सो अंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. हेच गुन्हे २०२१ च्या तुलनेत साडेतीन हजारपेक्षा जास्त वाढले आहेत.
घरातही मुली असुरक्षित
अनेक घटना या नात्याला काळीमा फासणाऱ्या घडल्या आहेत. घरातील किंवा नात्यातील व्यक्तींनीच या अल्पवयीन मुलींची छेड, अत्याचार केला आहे.
पालकांचा संवाद आवश्यक
शाळा, महाविद्यालयात जाताना किंवा घराबाहेर पडल्यावर आपल्या मुलीला काही त्रास आहे का? यासंदर्भात पालकांनी त्यांच्याशी संवाद ठेवणे आवश्यक आहे. सोबतच संस्कारांचीही गरज आहे. मोबाईलच्या जमान्यात संवादासोबतच मुली, मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
शिक्षेचे प्रमाणही ८ टक्के
बीड जिल्ह्यातील माहिती घेतली असता, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत शिक्षेचे प्रमाण ८.६० टक्के एवढे आहे. तर विनयभंगाच्या गुन्ह्यात ९.५२ टक्के एवढे आहे. इतर सर्व प्रकरणे निर्दोष सुटली आहेत. दोषसिद्धीचे प्रमाण कमी असल्यानेही गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याचे सांगण्यात आले.
अशी आहे गुन्ह्यांची आकडेवारी
वर्षे - गुन्हे
२०२१ - ६७२८
२०२२ - ८३५५
२०२३ - ९५७०
२०२४ - १०११२
मार्च २०२५ - २४७९