"मस्साजोग टाळलं, धारूरवरून आणलं!" सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे तांबव्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:24 IST2026-03-13T17:22:52+5:302026-03-13T17:24:04+5:30
कडक बंदोबस्तात भावाचा तेरवी विधी उरकला, फोटो काढणाऱ्यांचे मोबाईल जप्त

"मस्साजोग टाळलं, धारूरवरून आणलं!" सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे तांबव्यात
केज (जि. बीड): मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी जयराम माणिकराव चाटे याला शुक्रवारी कडक पोलीस बंदोबस्तात त्याच्या तांबवा (ता. केज) येथील मूळ गावी आणण्यात आले. मकोका न्यायालयाच्या आदेशानुसार, आपल्या दिव्यांग भावाच्या तेरवीच्या विधीसाठी त्याला दुपारी १२:४३ वाजता घरी आणण्यात आले होते.
१० कमांडो आणि स्थानिक पोलिसांचा वेढा
जयराम चाटेला बीड येथून १० सशस्त्र कमांडोंच्या सुरक्षेत आणण्यात आले. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या नेतृत्वाखाली २ पीएसआय आणि १० कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त पथक तैनात करण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मस्साजोगचा मुख्य मार्ग टाळून जयरामला धारूरमार्गे तांबव्यात आणले.
केवळ कुटुंबीयांना भेटीची परवानगी
घरात आल्यानंतर जयरामला फक्त आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणींव्यतिरिक्त कोणाशीही बोलण्यास किंवा भेटण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. दुपारी १:२२ वाजता विधी पार पडल्यानंतर त्याला पुन्हा पोलीस व्हॅनमधून बीडकडे नेण्यात आले. यावेळी त्याला निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती, तर जयरामनेही गाडीतून हात उंचावून प्रतिसाद दिला.
फोटो काढणाऱ्यांवर कारवाई
जयराम चाटे गावात आल्यापासून पोलिसांनी फोटो आणि व्हिडिओ घेण्यास सक्त मनाई केली होती. नियमांचे उल्लंघन करून फोटो काढणाऱ्या नागरिकांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले. विशेष म्हणजे, साध्या वेशातील एसआयटीच्या (SIT) एका अधिकाऱ्याचाही मोबाईल जप्त करण्यासाठी पोलीस धावले होते, मात्र ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.