मराठी भाषा दिन: माजलगावचा ट्रक ड्रायव्हर करतोय कुसुमाग्रज, गुलजारांच्या कवितेवर पीएच. डी.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:25 IST2026-02-27T11:24:07+5:302026-02-27T11:25:07+5:30
भारतचा प्रबंध मराठीबरोबर हिंदी भाषक अनुबंध जोडणारा असून ट्रकची चाके आता मराठी अक्षरापर्यंत पोहोचली आहेत.

मराठी भाषा दिन: माजलगावचा ट्रक ड्रायव्हर करतोय कुसुमाग्रज, गुलजारांच्या कवितेवर पीएच. डी.
-दिनेश लिंबेकर, माजलगाव (जि. बीड)
सलग दहा वर्षे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्याचे मराठी भाषा जीवन कसे समृद्ध करू शकते याचे आदर्श उदाहरण बीड जिल्ह्यातील सादोळ्याचा भारत सोळंके होय. गावखेड्यातील हा तरुण कवितेवरील प्रेमापोटी पुण्याला गेला. मराठी भाषेमुळे घडला. भारतने 'कुसुमाग्रज व गुलजार' यांच्या कवितेचा तौलनिक अभ्यास या विषयावरील लिहिलेला प्रबंध पुणे विद्यापीठात सादर केला. हा प्रबंध मराठीबरोबर हिंदी भाषक अनुबंध जोडणारा असून ट्रकची चाके आता मराठी अक्षरापर्यंत पोहोचली आहेत.
सादोळा (ता. माजलगाव) या गावात राहणाऱ्या भारतच्या वडिलांनी शेती विकल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. त्यामुळे दहावीलाच शिक्षण सोडून त्याला पाव विक्री, हॉटेल, पानटपरीवर काम, बर्फ गोळ्याचा गाडा चालवावा लागला. ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर, कैलास सोळंके यांनी कवी संमेलनात सहभागी करून त्याच्यातील उत्साह वाढला. त्यामुळे भारत याने शिक्षणाची वाट पकडली.
लवकरच भारत होणार डॉक्टर
माजलगाव मुक्त विद्यापीठाच्या केंद्रातून त्याने बी. ए. तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात एम. ए. मराठी पूर्ण केले आहे. २० ऑगस्ट २०२५ रोजी त्याने पीएच. डी. साठी पुणे विद्यापीठाला प्रबंध सादर केला असून लवकरच पीएच. डी. मिळणार असल्याने तो ट्रक ड्रायव्हरचा लवकरचे डॉक्टर होणार आहे.
ट्रक विकून बँकेत टाकले होते पैसे
२०१७ पर्यंत भारतने ट्रक चालवला. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षणास जाण्यापूर्वी कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून ट्रक विकून २ लाख रुपये आई गंगूबाई यांच्या नावाने बँकेत टाकले.
ट्रक लाइनला चक्क पुस्तकाचे व्यसन जडले
ट्रक लाइनमध्ये दारू, गुटखा, तंबाखूचे व्यसन कधी लागते हे कळत नाही. परंतु भारतला पुस्तकाचे व्यसन जडले होते. ट्रकच्या केबिनमध्ये पुस्तके असत. दिवसभर मेहनत करणारा भारत रात्री कोसला कादंबरी वाचल्याशिवाय झोपतच नसे.
महाराष्ट्रात रोज एका नव्या गावाला तो ट्रक घेऊन जाई तिथे नदी किनारी कविता लिहित आजपर्यंत त्याने ३०० कविता लिहिल्या आहेत. पुण्यातील एफटीआय या संस्थेने भारत सोळंकेवर १५ मिनिटाचा लघुपट तयार केला आहे.