जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्यांच्या पालकांना पूर्ण कर माफ; नांदुरघाट ग्रामपंचायतचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:20 IST2025-06-04T18:20:11+5:302025-06-04T18:20:29+5:30
नांदुरघाट ग्रामपंचायतमध्ये १६ सदस्य असून ६ हजार २०० मतदार आहेत. जवळपास दीड ते दोन हजार घरे आहेत.

जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्यांच्या पालकांना पूर्ण कर माफ; नांदुरघाट ग्रामपंचायतचा निर्णय
बीड : ज्यांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत, त्यांच्या पालकांची घरपट्टी, नळपट्टीसह सर्व कर माफ केला जाणार आहे. केज तालुक्यातील नांदुरघाट येथील ग्रामपंचायतने शनिवारी ऐतिहासिक हा ठराव घेतला. शाळा वाचविण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे.
नांदुरघाट ग्रामपंचायतमध्ये १६ सदस्य असून ६ हजार २०० मतदार आहेत. जवळपास दीड ते दोन हजार घरे आहेत. याच गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा असून १९७ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शाळेची इमारत निजामकालीन आहे. सर्व शिक्षकांचीही भरती आहे; परंतु काही खासगी शाळा स्थापन झाल्याने जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या रोडवत चालली होती. त्यामुळेच आता शालेय व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा कर माफ करण्याचा निर्णय घेतला. १ जून २०२५ पासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे शालेय समितीचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी सांगितले.
गाव कसे चालणार?
१९७ मुलांच्या कुटुंबाचा कर माफ केल्याने आर्थिक खर्च भागवायचा कसा? हा प्रश्न उपस्थित केला; परंतु नांदुरघाट येथे आठवडी बाजार भरतो. त्यातून मिळणारा कर आणि १५ व १६ व्या वित्त आयोगाचा निधी हा ग्रामपंचायत खर्चासाठी वापरायचा, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
गावात तीन खासगी संस्था
नांदुरघाट गावात राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या मालकीच्या तीन खासगी संस्था आहेत. त्यातील विद्यार्थी संख्या कमी होऊ नये यासाठी पाचवीच्या वर्गाला मान्यता असूनही तो सुरू करू दिला जात नाही. वेगवेगळे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना आकर्षित केले जाते. म्हणून सरकारी शाळेची पटसंख्या कमी होत आहे; परंतु आता ती वाचविण्यासाठीच ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
आंदोलन, न्यायालयातही धाव
नांदुरघाटच्या जिल्हा परिषद शाळेत पाचवीच्या वर्गाला मान्यता असतानाही तो सुरू नाही. मुलांचे प्रवेश इतर शाळेत ठेवून गावात शिकविले जाते. हा वर्ग सुरू करावा, यासाठी ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केले. तसेच न्यायालयातही याचिका दाखल केलेली आहे. तसेच शिक्षण उपसंचालकांचेही हा वर्ग सुरू करण्यासंदर्भात आदेश असल्याचे अमोल जाधव यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळा महत्त्वाचा घटक आहे. शाळेसाठी ज्या सुविधा, लागेल ती ग्रामपंचायत पुरवेल. शाळा टिकली पाहिजे, म्हणून हा निर्णय घेतला.
- सुनीता युवराज जाधव, सरपंच.
शाळा सुसज्ज असून सीसीटीव्ही बसवले आहेत. आम्हाला यु-डायस कोड द्यावा. गावकरी जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करत असताना शिक्षण विभाग सहकार्य करत नाही.
- अमोल जाधव, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, नांदुरघाट.