आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
By सोमनाथ खताळ | Updated: June 25, 2025 05:52 IST2025-06-25T05:51:57+5:302025-06-25T05:52:45+5:30
‘आमच्या सेवेचे मोल शून्य आहे का? आम्हाला अच्छे दिन कधी येणार?’, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
- सोमनाथ खताळ, बीड
आरोग्य सेवेत अहोरात्र झटणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील ३२ हजार कर्मचाऱ्यांचे एप्रिल आणि मे महिन्यांचे वेतन थकले आहे. ‘आमच्या सेवेचे मोल शून्य आहे का? आम्हाला अच्छे दिन कधी येणार?’, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. आरोग्य विभागात शिपाई ते अधिकारी, अशी पदे रिक्त आहेत. त्यामुळे कंत्राटी भरती करण्यात आली आहे.
महिन्याला १५० कोटींची गरज
राज्यात ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्रत्येक महिन्याला साधारण १५० कोटी रुपये लागत असल्याचे आरोग्याच्या वित्त विभागाकडून सांगण्यात आले. परंतु, हाच निधी वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आधीच कमी वेतन, त्यात...
राज्यात जवळपास १२ हजार समुदाय आरोग्य अधिकारी आणि इतर २० हजार, असे ३२ हजार कर्मचारी आहेत.
या सर्वांचे वेतन जुलै २०२४पूर्वी प्रत्येक महिन्याला होत असे. आता त्यांच्या वेतनाचे नियोजन बिघडले आहे.
मी संबंधित विभागाला बोलावून घेतले. त्यांनी निधी आल्याचे सांगितले आहे. सोमवारपर्यंत जिल्हास्तरावर निधी वितरीत करू. -डॉ. स्वप्नील लाळे, संचालक (शहरी), मुंबई
एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन थकले आहे. मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च भागवायचा कसा? असा प्रश्न आहे. -सचिन भोले, अध्यक्ष, एएचएम संघटना