उन्हाच्या झळा; पिण्याच्या पाण्यासाठी दिंद्रुडकरांचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 07:28 PM2021-04-28T19:28:48+5:302021-04-28T19:31:30+5:30

अवैधरीत्या चालू असलेल्या पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपावर कारवाई करण्याची धारुर प्रशासनाकडे जवळपास दीड महिन्यापूर्वीपासून मागणी केली होती.

Dindrudkar's Jalasamadhi movement for drinking water | उन्हाच्या झळा; पिण्याच्या पाण्यासाठी दिंद्रुडकरांचे जलसमाधी आंदोलन

उन्हाच्या झळा; पिण्याच्या पाण्यासाठी दिंद्रुडकरांचे जलसमाधी आंदोलन

Next

दिंद्रुड (जि. बीड) : प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्याने बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड ग्रामस्थांनी बुधवारी तब्बल तीन तास जलसमाधी आंदोलन आंदोलन केले व पाण्यात बसून प्रशासनाच्या नैराश्यपूर्ण भूमिकेविरोधात घोषणा दिल्या.

माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे सदन गाव म्हणून दिंद्रुड सर्वपरिचित आहे. १८ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या दिंद्रुड गावाला येथून ३ कि. मी. अंतरावर असलेल्या चाटगाव शिवारातील तलावातून पाणीपुरवठा होतो. सद्य:परिस्थितीत या तलावात केवळ १७.२ जिवंत साठा उपलब्ध आहे. वेळीच पाणी आरक्षित न केल्यास पुढील महिन्यात दिंद्रुडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवारसह ग्रामपंचायत सदस्यांनी धारुर तालुक्यातील चाटगावच्या तलावातून अवैधरीत्या सुरू असलेल्या पाणी उपसा व येत्या काही दिवसांत दिंद्रुडसाठी निर्माण होणारा खंडित पाणीपुरवठा यामुळे पाणी आरक्षित करत अवैधरीत्या चालू असलेल्या पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपावर कारवाई करण्याची धारुर प्रशासनाकडे जवळपास दीड महिन्यापूर्वीपासून मागणी केली होती.

धारुर तहसीलने मागणीची कुठलीही दखल न घेतल्यामुळे बुधवारी दिंद्रुड ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी तलावात जलसमाधी आंदोलन केले. सरपंच अजय कोमटवार, सदस्य अतुल चव्हाण, भारत गौंडर,नारायण चांदबोधले, राम उबाळे, रमेश शिंदे, मिलिंद देशमाने, भाऊ सुरवसे, हनुमान सोळंकेे आदी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी पाण्यात उतरले होते. धारुर तहसीलचे नायब तहसीलदार प्रकाश गोरड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत, समिती स्थापन करीत योग्य ती कारवाई करण्याची हमी दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार लेखी कारवाईच्या आश्वासनानंतर दिंद्रुडकरांनी आंदोलन मागे घेतले.

चाटगावच्या तलावातील पाण्यावर दिंद्रुडकरांचा हक्क नाही, चाटगावच्या शेतकऱ्यांचे शेतीसाठी पाणी बंद केल्यावर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल. प्रशासनाने विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
-केशव केकान, शेतकरी, चाटगाव

Web Title: Dindrudkar's Jalasamadhi movement for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.