लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील शेकटा येथे गावातील तरुण वर्ग व शासकीय नोकरदार, व्यावसायिक व ग्रामस्थांच्यावतीने शेकटा येथील फिरंगाई डोंगर परिसरातील खाणीवर लोकसहभागातून पावणेचार लाख रुपये किमतीचा लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. रविवारी संत-महंत व मान्यवरांच्याहस्ते बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन करण्यात आले.
सद्यस्थितीमध्ये संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली असताना, शेकटा येथील वसुंधरा प्रतिष्ठानच्यावतीने लाॅकडाऊनमध्ये फिरंगाई मंदिर परिसरातील खाणीवर वनराई बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम लोकसहभागातून जमा करण्यात आली. यामध्ये गावातील नोकरदार, बाहेरगावी खासगी काम करणारे हात व गावातील शेतमजूर, कामगार या सर्वांनी मोलाचा दगड उचलत बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. भूमिपूत्र असणाऱ्या संत-महंतांनी देखील या कामासाठी मोलाचे सहकार्य केले. प्रत्यक्ष काम पूर्णपणे जबाबदारीने पूर्ण करून घेण्यासाठी संपूर्ण वसुंधरा टीम मोठ्या जिद्दीने लढली.
रविवारी बंधाऱ्याचे जलपूजनप्रसंगी मच्छिंद्रगडाचे महंत जनार्धन महाराज, माऊली संस्थानचे नामदेव महाराज, चकलांबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख उपस्थित होते.
...
प्रतिष्ठानला मदतीचा हात
लोकवर्गणीतून झालेल्या बंधाऱ्याच्या कामाची व्याप्ती व महत्त्व लक्षात घेऊन जनार्धन महाराज, नामदेव महाराज, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी देखील वसुंधरा प्रतिष्ठानला मदतीचा हात पुढे करीत माणुसकीचे दर्शन घडविले. बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी अडविले जाणार आहे. यामुळे परिसरात पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.