'बीडची बारामती होण्यापूर्वीच दादा गेले...'; आठवणी सांगताना आमदार पंडित ढसाढसा रडले
By सोमनाथ खताळ | Updated: January 29, 2026 12:37 IST2026-01-29T12:32:44+5:302026-01-29T12:37:22+5:30
गुरुद्वारामधील कार्यक्रमात पगडी घातलेल्या दादांसोबत काढलेला शेवटचा फोटो हीच आता त्यांच्या आयुष्याची मोठी आठवण उरली आहे.

'बीडची बारामती होण्यापूर्वीच दादा गेले...'; आठवणी सांगताना आमदार पंडित ढसाढसा रडले
बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, बीडमध्ये त्यांच्या निकटवर्तीयांना अश्रू अनावर झाले आहेत. गेवराईचे राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार विजयसिंह पंडित यांनी अजितदादांच्या शेवटच्या भेटीच्या आणि संवादाच्या आठवणींना उजाळा देताना माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांना आपला शोक आवरता आला नाही. ते कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडले.
विजयसिंह पंडित म्हणाले, "नांदेडच्या कार्यक्रमात दादांनी मला त्यांच्या अंगरक्षकाच्या फोनवरून कॉल करून लवकर येण्यास सांगितले होते. त्यांची कामाची पद्धत आणि अधिकार इतका होता की, त्यांनी मला बाजूला घेऊन सांगितले, 'मी जे सांगतोय ते फक्त करत जा.' मी ही त्यांना 'दादा तुम्ही काहीही सांगा, मी तयार आहे' असे आश्वस्त केले होते. जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकांसाठी त्यांनी मला आवर्जून बोलावून घेतले होते." दादांच्या मायेचा उल्लेख करताना पंडित यांनी सांगितले की, एअरपोर्टवर पोहोचण्यापूर्वी दादांनी तीन वेळा चौकशी केली की मी आलो आहे का. त्यांचा फोन गाडीत असतानाही त्यांनी अंगरक्षक जाधव यांच्या फोनवरून मला 'दमाने ये' असा प्रेमाचा सल्ला दिला होता.
अधुरे राहिलेले स्वप्न
"बीड जिल्ह्याचा कायापालट होईल आणि जिल्ह्याची बारामती होईल, अशी मोठी आशा लोकांमध्ये निर्माण झाली होती; मात्र हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच दादा आम्हाला सोडून गेले. कुटुंबातील माणूस गेल्याचे दुःख आज होत आहे," असे म्हणताना पंडित ढसाढसा रडले. गुरुद्वारामधील कार्यक्रमात पगडी घातलेल्या दादांसोबत काढलेला शेवटचा फोटो हीच आता त्यांच्या आयुष्याची मोठी आठवण उरली आहे. बीडमधील 'शिवछत्र' निवासस्थानी यावेळी कार्यकर्त्यांनीही गर्दी केली होती. अनेकांचे डोळे पाणावल्याचे दिसले.
महाराष्ट्र पोरका झाला - प्रकाश सोळंके
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे कुटुंबप्रमुख तथा मार्गदर्शक अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी अजूनही मन स्वीकारायला तयार नाही. शेवटपर्यंत दादा सुखरूप असतील, हीच आशा मनात होती. दादा केवळ आमच्या कुटुंबाचे नव्हे, तर महाराष्ट्राचे आधारवड होते. त्यांच्या नेतृत्वाने, विचारांनी आणि आपुलकीने असंख्य माणसं जोडली गेली. आज त्या आठवणी मनात दाटून आल्या असल्या तरी व्यक्त होण्याची ताकद उरलेली नाही. या प्रचंड धक्क्यातून सावरणे कठीण झाले आहे, अशा भावना माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केल्या.