'अजित पवारांनी पालकमंत्रिपद घ्यावं, अंधारात कोण काय काय करतंय हे कळेल'; बजरंग सोनवणेंचा रोख कुणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:16 IST2024-12-27T14:15:20+5:302024-12-27T14:16:33+5:30
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज खासदार बजरंग सोनवणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता आरोप केला.

'अजित पवारांनी पालकमंत्रिपद घ्यावं, अंधारात कोण काय काय करतंय हे कळेल'; बजरंग सोनवणेंचा रोख कुणाकडे?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पोलिसांनी अजूनही काही आरोपींना अटक केलेली नाही. आरोपींना अटक करण्याची मागणी वाढली आहे. तर या गुन्ह्याचा तपास सीआयडी करत आहे. दरम्यान, आता यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घ्यावे अशी मागणी केली.
“मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे करुन दाखवले, ते अनेकांना बोलून करता आले नाही”: राज ठाकरे
'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कारवाई करु, देशमुख यांना न्याय देऊ असं सांगितलं आहे. पण, अजूनही असं काही होत असल्याचे दिसत नाही. काही दिवस याचा तपास पोलिस करत होते, यानंतर सीआयडीकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. पोलिस यंत्रणेला हे तिनही गुन्हे कुठेतरी लिंक असल्याचं पोलिसांच्या लक्षात आले आहे. यामुळे या गुन्हाच्या पाठिमागचा कोण मास्टरमाइंड आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली.
गुन्हेगारांना कोण पाठबळ देत आहे त्याचा तपास केला पाहिजे
"कोण सीआयडीची मागणी तर कोण एसआयटीची मागणी करत आहे. पण मी पहिल्या दिवसापासून सीबीआयची मागणी करत आहे. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या पाच वर्षापासून वेगळ्या ट्रॅकवर गेला आहे. याच्यात कोण आहे ते तपासले पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळत आहे. या गुन्ह्याच्या संदर्भात मी कोणाच नाव घेण्यापेक्षा लोकांना सर्व गोष्टी माहित आहेत. बीड जिल्ह्यात ज्या घटना घडल्या आहेत. त्या घटनेचा उहापोह झालेला नाही, दमानिया यांनीही व्हिडीओ शेअर केल्या आहेत. याचे तपास केले पाहिजेत. या गुन्हेगारांना कोण पाठबळ देत आहे त्याचा तपास केला पाहिजे. सीडीआर काढला तर याची सर्व माहिती मिळेल, असंही बजरंग सोनवणे म्हणाले.
"मागच्यावेळी जे सत्तेत आहेत त्यांनी या पोलिसांना खुर्चीवर बसवले आहे. असा आरोप त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर केला. एसपी साहेब आता आमच्याकडे नवीन जॉईन झाले आहेत. त्यांनी आता बदल केले पाहिजेत.
या आधीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, त्यामुळे अंधारात कोण काय काय करतंय हे जाणून घ्यायचं असेल तर अजितदादांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावं अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली.