लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मानवी हक्क अभियान व बहुजन मजूर पक्षाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात दोन तास रखरखत्या उन्हात मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.५ मार्च राजी संजय ताकतोडे यांनी येथील बिंदुसरा धरणात मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब, क, ड प्रमाणे ५ टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जलसमाधी घेतली आहे. यामुळे राज्यातील सर्व मातंग समाज शासनाच्या विरोधात पेटून उठला आहे. प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण हे उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेले आहे. १३ टक्यांमध्ये मातंग समाज हा उपेक्षितच आहे. उपेक्षित राहिलेल्या मातंग समाजाला १३ टक्क्यात वेगळा कोटा ठेवून बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्यासाठी शासनाने मातंग समाजाला वर्गीकरण करून देण्यात यावे याशिवाय मातंग समाज हा मुख्य प्रवाहात येणार नाही, मयत संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून ५० लक्ष रूपये देण्यात यावेत, मातंग समाजासाठी शासनाने घोषित केलेल्या स्वतंत्र घरकुल योजना राबविण्यात यावी, मातंग समाजासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावेत, लहूजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनास काँग्रेस अनुजातीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे, मल्हार सेनेचे विलास नेमाणे, दशरथ सुतार, प्रदीप तांबे, बाबा टाकणखार, शेख रशीद, तात्या पांचाळ यांनी पाठिंबा दिला. बाबासाहेब मुजमुले, मधुकर कांबळे, आप्पा भारस्कर, रमेश गवळी, बंडू खंडागळे, महादेव उमाप, विष्णू उगले, परमेश्वर अडागळे, अशोक ढगे, विवेक जाधव, दयालसिंग टाक, कैलास आवाड, अमोल ढगे, आदर्श मुजमुले, खंडू खंडागळे, उल्हास मुजमुले, प्रल्हाद दळवी, अनिकेत वाघमारे, खैरूल्ला खान यांचेसह मानवी हक्क अभियान व बहुजन मजूर पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास मानवी हक्क अभियान, बहूजन मजुर पक्ष आंदोलन छेडण्याचा इशारा राजेश घोडे यांनी दिला आहे.
मानवी हक्क अभियानचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:55 AM