Diwali 2018 : फटाक्याने त्वचा जळली तर काय कराल आणि काय नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 12:28 IST2018-11-06T12:28:42+5:302018-11-06T12:28:58+5:30
दिवाळी म्हटलं की रोषणाई सोबतच फटाके आलेच. पण फटाके फोडताना योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर चांगलंच महागात पडू शकतं.

Diwali 2018 : फटाक्याने त्वचा जळली तर काय कराल आणि काय नाही?
दिवाळी म्हटलं की रोषणाई सोबतच फटाके आलेच. पण फटाके फोडताना योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर चांगलंच महागात पडू शकतं. फटाके फोडताना हवी ती काळजी न घेतल्याने तुम्हाला आनंदाला नजर लागू शकते. दिवाळीचे फटाके फोडताना अनेकांना जळणे, जखम होणे अशा समस्या होतात. तसेच डोळ्यांमध्ये जळजळ होणे, श्वास रोखला जाणे, कान बंद होणे अशाही समस्या होतात. अशावेळी वेळेवर काय काळजी घ्यायची असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे आम्ही काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
फटाक्यांनी जळाल्यावर काय करावे?
1) जळणंही दोन प्रकारचं असतं, एक असतं सुपरफिशल बर्न म्हणजे अशाप्रकारे जळाल्यावर वेदना होतात आणि जळाल्याचा चट्टा उमटतो. दुसरं असतं डीप बर्न यात शरीराचा जळालेला भाग सुन्न होतो. जर जळालेल्या जागेवर वेदना होत असतील तर समजा की, स्थिती गंभीर आहे. अशावेळी जळालेल्या भागावर पाण्याची धार सोडा. याने वेदनाही कमी होतील आणि चट्टेही पडणार नाही.
२) जळालेल्या भागावर बरनॉल लावू नका. त्याऐवजी ऑलिव ऑईल लावा. त्यानंतरही जर वेदना होतच असतील तर लगेच डॉक्टरांना दाखवा.
३) अनेकदा लोक फटाक्याने जळाल्यावर बरनॉल, निळं औषध, शाई, पेट्रोल हे लावतात. याने त्यावेळेपुरत्या वेदना थांबतात. पण याने जखमेवर रंग लागतो आणि याने समस्या वाढूही शकते.
४) जखम झालेल्या भागावर थंड पाणी टाका. तसेच पाण्याच्या भांड्यात जखम झालेला भाग धरा.
५) जळालेला भाग वेदना कमी होईपर्यंत कमीत कमी १५ मिनिटे पाण्यात ठेवायला पाहिजे. तसेच एखादा स्वच्छ कापड भिजवूनही तुम्ही जखमेवर लावू शकता. पण कापडाने जखम घासू नका.
६) फटाक्याने शरीराचा एखादा भाग जास्तच जळाला असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. याबाबत दुर्लक्ष करु नका. डॉक्टरकडे जाताना जखमेवर ओला कपडा ठेवू शकता.
जळाल्यावर काय करुन नये
१) फटाक्याने त्वचा जळाल्यावर अनेकजण बर्फ लावतात. बर्फाने जळजळ कमी होईल पण याने त्या जागेवरील रक्त गोठण्याची शक्यता असते. याने तुमचां रक्तसंचार कमी होऊ शकतो. त्यामुळे बर्फाचा वापर टाळावा.
२) कधीही जळालेल्या जागेवर कापसाचा वापर करु नका. कापूस त्वचेवर चिकटू शकतो, याने तुम्हाला आणखी जळजळ होऊ शकते. यासोबतच बॅक्टेरिया वाढण्याचीही शक्यता असते.
३) जळालेल्या जागेवर तूप किंवा मलम लगेच लावणे टाळा आणि पुरळ आल्यावर त्या फोडण्याची चूकही करु नका. याने संक्रमण पसरु शकतं आणि त्रास वाढू शकतो.
४) जास्त जळालं असेल तर घरीच उपचार करण्याऐवजी वेळीच रुग्णालयात जावे. जळालेल्या जागेवर एखादा कापड चिकटलेला असेल तर काढू नका.
५) बटर, पीठ किंवा बेकिंग सोडा आगीवर कधीही टाकू नका.
६) क्रीम, लोशन किंवा तेलाचा ट्रिटमेंट म्हणून कधीही वापर करु नये.
७) जखम कधीही खाजवू नका किंवा त्यावरी मास काढू नका.