फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:34 IST2026-04-13T12:33:40+5:302026-04-13T12:34:05+5:30
भारत जपानला मागे टाकत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या रुपात समोर आला आह. आता सध्या या क्षेत्रात अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे आहेत.

फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र सातत्याने विस्तारताना आणि नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना दिसत आहे. आगामी ७ वर्षांत भारत जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. भारत जपानला मागे टाकत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या रुपात समोर आला आह. आता सध्या या क्षेत्रात अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे आहेत.
यासंदर्भात भाष्य करताना, नितीन गडकरी यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये ७ लाख कोटी रुपयांवर असलेला ऑटोमाईल बाजार आता २२ लाख कोटींवर पोहोचला आहे. सध्या अमेरिका ७९ लाख कोटी आणि चीन ४९ लाख कोटी रुपयांसह प्रत्येकी क्रमांक एक आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
सध्या सरकार 'टेक्नॉलॉजी फॉर लाईफ' या सूत्रावर आधारित तंत्रज्ञानावर भर देत आहे -
या वेगाची अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर. सध्या इलेक्ट्रिक वाहने (EVs), हायड्रोजन इंधन आणि इतर पर्यायी इंधनांवर काम सुरू आहे. यामुळे केवळ पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी होणार नाही, तर प्रदूषणही कमी होईल. सध्या सरकार 'टेक्नॉलॉजी फॉर लाईफ' या सूत्रावर आधारित तंत्रज्ञानावर भर देत आहे. म्हणजेच असे तंत्रज्ञान जे लोकांचे जीवन अधिक सोपे आणि चांगले बनवते.
नितीन गडकरी यांच्या मते, सरकार वाहतूक खर्च कमी करण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे. सध्या भारतात मालवाहतुकीचा खर्च प्रचंड आहे. यामुळे वस्तू महाग होतात. हे कमी करण्यासाठी जलमार्गांचा वापर वाढवण्याची योजना आहे, कारण याचा खर्च रस्ते वाहतुकीच्या तुलनेत फार कमी आहे.
रस्ते वाहतुकीसाठी १० रुपये आणि रेल्वेसाठी ६ रुपये खर्च येतो. मात्र जलमार्गासाठी केवळ १ रुपयाच लागतो. असेही त्यांनी सांगिते याशिवाय, टाकाऊ स्टील स्लॅगचा वापर आता रस्ते बांधणीत केला जात आहे. हे क्षेत्र साडेचार कोटी लोकांना रोजगार देत असून, जीएसटी आणि निर्यातीद्वारे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.