मराठवाड्यातील ३.५ लाख हेक्टर पिकांवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:38 PM2020-09-28T12:38:32+5:302020-09-28T12:39:19+5:30
मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच राज्य शासनासमोर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी लोकमतला रविवारी औरंगाबाद येथे दिली
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांवर अस्मानी संकट ओढावले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार विभागातील ३० तालुक्यात १, ८९८ गावांतील सुमारे ६ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ३० हजार हेक्टरवरील खरीप हंगामातील पीक हातातून गेले आहे.
पंचनामे आणि पीकपाहणी सुरू असून यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही स्थिती आहे. मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच राज्य शासनासमोर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी लोकमतला रविवारी औरंगाबाद येथे दिली. भुसे यांनी ४ जिल्ह्यांतील अतिवृष्टी झालेल्या भागातील खरीप हंगामातील पिकांची पाहणी करून आढावा घेतला.
औरंगाबाद जिल्ह्यातील ९८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९५ हजार हेक्टर जिरायत, १३ हजार २५६ हेक्टर बागायत, १२ हजार ५८६ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार दिसते आहे.
ऑक्टोबर- नोव्हेंबर - २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील खरीप हंगामातील पीक वाया गेले होते. विभागातील ४४ लाख ३३ हजार ५४९ शेतकऱ्यांच्या ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.