स्मशानभूमीला रस्ताच नाही; बसस्थानकासमोर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 09:59 PM2018-05-18T21:59:46+5:302018-05-18T22:00:24+5:30
गुरुकुंजात गुरुवारी अघटित घडले. मृतदेहाला शेवटच्या प्रवासात आपल्या चीरनिद्रेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध न झाल्यामुळे नातेवाइकांनी शासनाच्या तुघलकी कारभारावर ताशेरे ओढत मोझरी बस स्थानकाच्या पुढ्यात जुन्याच जागी अंत्यविधी आटोपला.
![There is no road to the crematorium; The funeral before the bus stand | स्मशानभूमीला रस्ताच नाही; बसस्थानकासमोर अंत्यसंस्कार There is no road to the crematorium; The funeral before the bus stand | स्मशानभूमीला रस्ताच नाही; बसस्थानकासमोर अंत्यसंस्कार](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/18amph16_20180587763.jpg)
स्मशानभूमीला रस्ताच नाही; बसस्थानकासमोर अंत्यसंस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज (मोझरी) : गुरुकुंजात गुरुवारी अघटित घडले. मृतदेहाला शेवटच्या प्रवासात आपल्या चीरनिद्रेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध न झाल्यामुळे नातेवाइकांनी शासनाच्या तुघलकी कारभारावर ताशेरे ओढत मोझरी बस स्थानकाच्या पुढ्यात जुन्याच जागी अंत्यविधी आटोपला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुकुंजाला विकास आराखड्यात नवीन स्मशानभूमी निर्माण करण्यात आली; पण त्याकरिता रस्ता देण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. ज्या शेतातून रस्ता मंजूर आहे, त्या शेतमालकाच्या आडमुठेपणाने संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे बांधकाम केले नाही. त्यामुळे कुठल्याही ऋतूत अंत्यसंस्कारासाठी हे ठिकाण गाठणे अतिशय अवघड झाले आहे. त्याचा मोझरी येथे निषेध नोंदविण्यात आला.
मंजुळामाता नगरातील त्रिवेणी शेंदरे (६५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी जळाऊ लाकडे घेऊन पुढे गेलेला ट्रॅकटर स्मशानभूमीच्या वाटेवर झालेल्या चिखलात फसला. यामुळे नियोजित वेळेपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता पाहून नागरिकांनी अखेर नवनिर्मित बस स्थानकापुढील जुन्या स्मशानभूमीमध्ये हा विधी पार पाडला. यावेळी गावकऱ्यांनी शासनाच्या बेजबाबदार यंत्रणेचा निषेध नोंदविला. स्मशानभूमीची समस्या अतिशय गंभीर असून, नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर शासकीय अधिकाऱ्यांनी ‘हे काम आमचे नाही’ असे बोलून हात झटकले.
अंत्यविधी आटोपत असताना घटनास्थळावरून जात होते. तहसीलदार राम लंके यांच्याशी संपर्क साधून या कामाबाबत विचारणा केली तसेच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत आहे. स्मशानभूमीत झाडांना अतिपाणी दिल्यामुळे परिसरात चिखल झाला आहे.
- निवेदिता दिघडे, प्रदेश सचिव, भाजप