अमरावतीत एसटी वाहकाची दारूच्या वादातून हत्या, पोलिसांनी दीड तासात आरोपींना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 00:17 IST2026-04-10T00:10:57+5:302026-04-10T00:17:14+5:30
अवघ्या अर्ध्या तासात मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान ते एसटी महामंडळाचे कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले.

अमरावतीत एसटी वाहकाची दारूच्या वादातून हत्या, पोलिसांनी दीड तासात आरोपींना ठोकल्या बेड्या
-प्रदीप भाकरे, अमरावती
Amravati Crime: अकोली रेल्वे स्थानक परिसरातील देशी दारू भट्टीवर झालेला किरकोळ वाद एकाच्या जिवावर बेतला आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादाचा राग मनात धरून एका ४६ वर्षीय इसमाची लाकडी दांडके आणि बेल्टने मारहाण करून हत्या करण्यात आली. किरण कमलाकर पुणतांबेकर (४६, रा. सप्तश्री अपार्टमेंट, अकोली रोड, अमरावती) असे मृताचे नाव आहे.
किरण पुणतांबेकर हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते, मात्र गेल्या वर्षभरापासून ते कर्तव्यावर गैरहजर होते, अशी माहिती समोर आली आहे. या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, शहर पोलिसांनी अवघ्या दीड ते दोन तासात दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
आकाश अंतराम धुर्वे (२४, रा. चांदुरी, ह.मु. अकोली) आणि स्वप्निल साहेबराव चतुर (२१, रा. अकोली, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एसटी वाहकाची हत्या कशी झाली?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरण पुणतांबेकर आणि आरोपींचा रेल्वे स्टेशन परिसरातील देशी दारू भट्टीवर दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता.
हा वाद तिथेच न थांबता आरोपींनी त्याचा राग मनात धरला. त्यानंतर पुणतांबेकर यांना अकोली येथील क्रिकेट मैदानावर नेले. तेथे त्यांना लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने आणि बेल्टने बेदम मारहाण केली.
दुपारी दोनच्या सुमारास ती घटना घडली पुणतांबेकर यांना अर्ध मेल्या अवस्थेत टाकून आरोपींनी पोवारा केला. त्यानंतर उन्हाचा तडाका व उपचाराअभावी पुणतांबेकर यांचा मृत्यू झाला.
पोलिसांंनी आरोपींना कसं शोधलं?
गुरुवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहावर काठीने मारल्याच्या खुणा होत्या तथा घटनास्थळी काठीचा तुकडा व बेल्ट देखील आढळून आला होता.
अवघ्या अर्ध्या तासात मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान ते एसटी महामंडळाचे कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, गुन्हे शाखाप्रमुख संदीप चव्हाण यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती आणि घटनास्थळाची स्थिती पाहता हा वाद दारूतून झाला असावा, असा कयास पोलिसांनी लावला होता.
शहरात हत्येची घटना घडल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या एक ते दीड तासात दोन्ही आरोपींना अटक केली. दारूच्या वादातूनच ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.