लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथील नाल्याला अचानक आलेल्या पुरात दोन स्थानिक तरुण वाहून गेले. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना उघड झाली. माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची चमू खारतळेगाव येथे पोहोचली. तहसीलदारांसह तलाठी, पोलीस पाटील, सरपंच घटनास्थळी तळ ठोकून आहेत. वाहून गेलेल्या तरुणांचा युद्धस्तरावर शोध चालविला आहे. रविवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास खारतळेेगाव, वायगाव, विर्शी व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्या दमदार पावसाने खारतळेगावाच्या मधोमध वाहणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला. पावसामुळे दर्यापूर अमरावती रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. पाऊस थांबल्यानंतर गावकऱ्यांनी पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी केली. तेव्हा प्रवीण रामराव गुडधे (३२) व निरंजन आकारामजी गुडधे (३४) हे पुरात वाहून गेल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यानंतर लगेच रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी ४.३० ते ५ पासून शोधकार्य सुरू झाले.
गावात खळबळ प्रवीण व निरंजन हे चुलतबंधू धामोरी येथे एका लग्नसमारंभात गेले होते. ते परत येत असताना खारतळेगाव बस थांब्यावर उतरले. तेथून पायी येत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. प्रवीण व निरंजन दोघेही विवाहित आहेत. वृत्त लिहिस्तोवर त्यांचा शोध लागला नव्हता.