शेतकऱ्यांनीच फिरविले सोयाबीनवर रोटावेटर

By Admin | Updated: October 3, 2015 00:03 IST2015-10-03T00:03:06+5:302015-10-03T00:03:06+5:30

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पीकाला गरजेच्या वेळी पावसाने दगा दिला.

Farmers rotate rotavator at soybean | शेतकऱ्यांनीच फिरविले सोयाबीनवर रोटावेटर

शेतकऱ्यांनीच फिरविले सोयाबीनवर रोटावेटर

सुमित हरकुट अमरावती
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पीकाला गरजेच्या वेळी पावसाने दगा दिला. कीड व रोगांचा प्रार्दुभावाने खरीपाचे सोयाबीन नष्ट झाले. तर काही पिकांचे उत्पादन खर्च तर दूर मळणीचा खर्चही निघणे कठीण असल्याने काही शेतकऱ्यांद्वारा सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटावेटर फिरवल्या जात असल्याचे विदारक चित्र आहे.
खरीप पिकातील शेतकऱ्यांसाठी अति महत्वाचे समजल्या जाणारे सोयाबीन हे पीक जिल्हातील शेतकऱ्यासाठी ‘कॅश क्रॉप’ पीक आहे. परंतु पावसाने दगा दिला अन् बळीराजाला मोठ्या आर्थिक नुकसानीच्या खाईत लोटल्याचे चित्र उभे ठाकले आहे. या पिकावर अवलंबूनच शेतकरी आपल्या शेती खर्चासह दिवाळी आणि दसरा साजरा करण्याचे नियोजन आखतात. त्यानुसार मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र यावर्षी पावसाने वेळीच दांडी मारल्याने तसेच पीक फुलोरला आल्यावर पावसाने हुलकावणी दिली. जवळजवळ एक महिना पावसाने दांडी मारली. त्यामुळे सोयाबीनला आलेला फुलोर गळू लागला होता. मात्र शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना पीक हातात येणार ही आशा होती. मात्र, आता पीके काढण्याचा वेळी सोयाबीनच्या शेंगाच भरल्या नाही तर ज्या सोयाबीनच्या शेंगा भरल्या त्यांचा दाणा वाढला नाही. पीक उत्पन्नाची सरासरी एकरी दीड ते दोन क्विंटल प्रति उत्पन्न होवू लागले. त्यामुळे जिल्ह्यासह चांदुरबाजार तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकावर ‘रोटावेटर’ फिरवून स्वत: पीक उद्धवस्त केले. पूर्वीच कर्जाचे डोंगर घेवून शेतकऱ्यांनी यंदा पेरणी केली. यावेळेस तरी पीक चांगले येणार या आशेवर पेरण्या केल्या. मात्र पावसाने शेतकऱ्यांना निराशाच दिली.

शेकडो हेक्टर पीक उद्धवस्त : सोयाबीन काढणे परवडत नाही
मुख्यमंत्री देणार लक्ष !

शेतकऱ्यांनी समस्या सांगव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वरुड येथे झालेल्या कृषी व संत्रा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. सोयाबीन उत्पादन खर्चही निघणे कठीण असल्याने शेतकरी उभ्या पिकावर नांगर फिरवित आहे. या वेदनेकडे मुख्यमंत्री लक्ष देणार का, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आसेगाव भागातील एका शेतशिवारात शेतकऱ्याने आपल्या शेतात रोटावेटर फिरविले असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची सरासरी पीक एकरी १ ते २ क्विंटल प्रति एकर पीक निघाल्याने शेतकऱ्यांच्या हाती निराशा येत आहे.
- राजीव मेश्राम
तालुका कृषी अधिकारी.

Web Title: Farmers rotate rotavator at soybean