मेळघाटात वरुणराजाचा दुष्काळ! १२९ गावांची तहान टँकर-विड्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:17 IST2025-06-25T15:14:02+5:302025-06-25T15:17:29+5:30
टंचाई कायम : १२७ विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण, २० टँकरवर मदार

Drought in Melghat! 129 villages thirst for tankers and water
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गत मे महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार निर्माण केला होता. त्यानंतर आता निम्मा जून महिनाही संपत आला आहे. असे असताना वरुणराजा मात्र अद्यापही बरसला नाही. परिणामी, जिल्ह्यातील मेळघाटासह गैर आदिवासी भागातील १० हजारांवर नागरिकांना २० टँकर व १२७ विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करून १२९ गावांची तहान भागविली जात आहे.
पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, अद्याप जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी, ग्रामीण भागात टँकर आणि विहीर अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये जून महिन्यापर्यंतचे नियोजन केले आहे. मात्र, दरवर्षी जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. पाणीटंचाई निवारणाचे काम वरुणराजा करतो. यंदा जिल्ह्यात उन्हाचा तडाखाही चांगला वाढला आहे. अद्यापपर्यंतही जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. पाऊस लवकर पडला तर टँकर, बोअरवेल अन् विहिरी अधिग्रहण पाणीपुरवठ्यातून नागरिकांचीही सुटका होणार आहे. पाऊस पडत असला तरी कुठे पडतो, तर कुठे काहीच नाही. त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती जोरदार पाऊस पडेपर्यंत सुधारणार नाही.
चिखलदऱ्यातील १० गावांत टँकरने पाणी
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी, खडीमल, मोथा, लवादा, शहापूर, तारुबांदा, गौलखेडा बाजार, मेहरीअम, बहादरपूर, धरमडोह, गवळीढाणा, आलाडोह, खिरपाणी आदी १० गावांत २० टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
४३ बोअरवेल, ८४ विहिरींचे अधिग्रहण
पाणीटंचाई निवारणार्थ प्रश्न सोडविण्यासाठी १०९ गावांत विहिरी, ४३ बोअरवेल आणि ८४ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणांहून वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. यामधून पाणीटंचाईची समस्या निवारण केले जात आहे.
"पाणीटंचाई आराखड्यातील नियोजनानुसार ज्या गावात सध्याही पाणीटंचाईची समस्या आहे, अशा दहा गावांत टँकरने तर १०९ गावांत विहीर व बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे."
- सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग