‘कॅलिफोर्निया’वर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:36 AM2019-04-29T01:36:08+5:302019-04-29T01:36:35+5:30

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुका प्रसिद्ध आहे. तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. तथापि, संत्रा ऐन आंबिया बहराला आला असताना, पाणी टंचाईने तोंड वर काढले. विहिरी कोरड्या पडू लागल्या.

Crisis on 'California' | ‘कॅलिफोर्निया’वर संकट

‘कॅलिफोर्निया’वर संकट

Next
ठळक मुद्देआंबिया बहराला गळती : पाणीटंचाई, वाढत्या तापमानाचा परिणाम

संजय खासबागे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुका प्रसिद्ध आहे. तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. तथापि, संत्रा ऐन आंबिया बहराला आला असताना, पाणी टंचाईने तोंड वर काढले. विहिरी कोरड्या पडू लागल्या. बोअर बंद पडले. सिंचन प्रकल्प कोरडे पडले. अतिशय तापमान व खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्रा वाचविणे कठीण झाले आहे. तापमान वाढल्याने पाने पिवळी पडत आहे, तर कोळी रोगाने आंबिया बहराला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने संत्रउत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात येथून चवदार संत्र्याची निर्यात केली जाते. तालुक्यात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग तसेच लघू, मध्यम सिंचन प्रकल्पाची संख्या अधिक आहे. त्यामुळे बागायती पिके आणि संत्र्याचे क्षेत्र मोठे आहे. मात्र, गतवर्षी पाऊस समाधानकारक होऊनसुद्धा मार्चपासूनच भूजल पातळी झपाट्याने खालावल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील नऊ सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट असून, शेतातील विहिरी, बोअर आटले. वरूड तालुका ‘ड्राय झोन’ असल्याने नवीन विहिरी, बोअर करण्यावर बंदी आहे. पाणीटंचाईमुळे संत्राउत्पादकांना संत्रा वाचविण्याची चिंता लागली आहे. हजारो हेक्टरमधील संत्राबागा सुकण्याच्या मार्गावर असताना आंबिया बहरालासुद्धा ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे गळती लागल्याने पीक हातून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे संत्राबागा वाचविण्याकरिता शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. यातच आंबिया बहरावर फळझड आणि कोळी हे रोग गेल्याचे सांगण्यात येते. यामुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक संत्रा गळती झाल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
अति तापमानामुळे आंबिया बहराला गळती
मार्च, एप्रिल महिन्यातच तापमान ४३ ते ४५ अंशावर गेल्याने संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. आधीच सुलतानी संकटाने पिचलेल्या संत्राउत्पादकांवर अति तापमानाच्या रुपात नैसर्गिक संकट कोसळले आहे. गळतीमुळे शेतकºयांच्या हाती आलेले संत्र्याचे नगदी पीक वाया जात आहे.

संत्रा आंबिया बहाराची फळगळती थांबविण्याकरिता २-४ डी किंवा जिब्रेलिक आम्ल, १५ पी.पी.एम. (१.५ ग्रॅम) एक किलो युरिया व कार्बेन्डॅजिम १०० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास या रोगाचा प्रतिबंध करता येऊ शकते. फवारणीने संपूर्ण झाड ओले होणे आवश्यक आहे.
- राजीव साबळे
कृषी अधिकारी, वरुड

तालुक्यात एकीकडे भूजल पातळी खालावली, तर दुसरीकडे अति तापमानाचा फटका बसत असल्याने संत्रा आंबिया बहराला चांगलीच गळती लागली आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक संत्री गळाल्याने उत्पादकांना लाखो रुपये नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. संत्रा उत्पादकांना आर्थिक अनुदान द्यावे.
- उद्धवराव फुटाणे
संत्रा उत्पादक, तिवसाघाट

अनपेक्षितपणे वाढलेले तापमान, वातावरणातील बदलामुळे माऊट्स आणि थ्रिप्सची लागण झाल्यामुळे प्रचंड फळगळती सुरू आहे. पाण्याची कमतरता आणि जमिनीतील उष्णताही त्यास कारणीभूत आहे. फळगळतीमुळे शेतकºयांना लाखो रुपायंचे नुकसान सहन करावे लागत आहे.
- प्रशांत मानकर
संत्रा उत्पादक, गाडेगाव

Web Title: Crisis on 'California'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती