लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणा रामनाथ : येथून जवळच असलेल्या खेड आणि पिंप्री गावांमध्ये परिसरात गेल्या तीन महिन्यांपूर्वी टमाटर, टरबूज, खरबूज याची लागवड शेतकऱ्यांनी केली. पीक आता तोडणीला आले असताना, कोरोनाच्या उद्रेकाने बाजारपेठ बंद झाली. त्यामुळे या दोन्ही गावांत ओलिताची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांचे या पिकापोटी सुमारे एक कोटी रू पयाचे नुकसान झाले आहे.दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी ५० ते ६० एकर शेतात टरबूज, खरबूज, आणि टमाटरची लागवड केली होती. यामधून सुमारे २५ ते ३० टन उत्पादनाची अपेक्षा होती. एकरी दोन लाख रुपये या उत्पादनातून मिळणार होते. परंतु, संपूर्ण बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था असलेला शेतकरी १० रुपये किलोपेक्षा कमी दराने आपला शेतमाल जेवढा शक्य होईल तेवढा विकत आहे.शेतकरी गजानन बोखडे यांनी टरबुजाकरिता एकरी ५० हजार रुपये खर्च केले. परंतु, दोन रुपये किलो दराने फळ जात असल्याने लागवडीचा खर्चसुद्धा निघाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दिल्ली, मुंबई, कोलकाता, भोपाल, नागपूर, पुणे आदी बाजारपेठेत त्यांचा माल दरवर्षी जातो. परंतु, तेथील संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने शेतमालाला उठाव नाही. मागणी असली तरी संपूर्ण ग्राहकांपर्यंत शेतकरी पोहोचू शकत नाहीत. लॉकडाऊनने त्यांना हवालदिल केले आहे. संपूर्ण वर्षभराचे आर्थिक बजट कोसळले आहे. शेतावर काम करणारे शेकडो मजूर आज बेरोजगार झाले आहेत. शासन धान्य देते; पण किराणा कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.खेड येथील सधन शेतकरी नितीन ठाकरे यांनी तीन एकरात टमाटरची लागवड केली. पिकाची काळजी घेतल्याने सुमारे चार हजार कॅरेट टमाटरचे उत्पादनाचा हिशेब त्यांनी लावला. प्रतिकॅरेट ९०० रुपये दराने चार लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित होते. परंतु, लॉकडाऊनचा फटका बहारलेल्या टमाटरला बसला. बाजारपेठ बंद असल्याने झाडालाच टमाटर सुकले. दोन ट्रक टमाटर रस्त्यावर फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. तीन एकरात शिमला मिरची आहे. व्यापारी येतात, पाहतात आणि निघून जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नीलेश बोदडे, आशिष बोदडे, सुनील साठे या शेतकऱ्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
टरबूज, टोमॅटोचे कोट्यवधींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 5:00 AM
दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी ५० ते ६० एकर शेतात टरबूज, खरबूज, आणि टमाटरची लागवड केली होती. यामधून सुमारे २५ ते ३० टन उत्पादनाची अपेक्षा होती. एकरी दोन लाख रुपये या उत्पादनातून मिळणार होते. परंतु, संपूर्ण बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था असलेला शेतकरी १० रुपये किलोपेक्षा कमी दराने आपला शेतमाल जेवढा शक्य होईल तेवढा विकत आहे.
ठळक मुद्देएक ट्रक टोमॅटो रस्त्यावर फेकले : टरबुजाची मातीमोल भावाने विक्री